औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे माझ्यासाठी नेहमीच वंदनीय आहेत आणि राहतील. भावनेच्या भरात मी बोललो होतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी चार दिवसानंतर मौन सोडले.
मी इकडे जाणार, तिकडे जाणार अशा वावड्या उठवण्यात आल्या, पण शेवटच्या श्वासापर्यंत मी शिवसेनेचा पाईक राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाल्यानंतर श्री. खैरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली होती. तेव्हापासून त्यांनी मौन बाळगले होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची श्री. खैरे यांनी रविवारी (ता.१५) भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१६) पत्रकार परिषद घेतली.
संबंधित बातमी : मला अनेक पक्षांकडून ऑफर, मात्र मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार
आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल प्रसारमाध्यामांशी बोलतांना दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की गेली तीस-पस्तीस वर्ष मी राजकारणात आहे. आमदार, खासदार, मंत्री आणि नेतेपदही मला मिळाले. ठाकरे कुटुंबियांच्या आशिर्वादानेच माझी यशस्वी वाटचाल सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देखील उध्दव ठाकरे यांनी मला धीर देत या पराभवातून निश्चितच काही चांगले घडेल असा विश्वास दिला होता. राज्यसभेवर मला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती मिळाली नाही आणि भावनेच्या भरात मी बोललो. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठदेखील माझ्यावर नाराज झाले. त्याबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो.
मी ‘मातोश्री’चा पाईक
मी ‘मातोश्री’चा पाईक आहे, ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीबरोबर काम करतोय त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मला समजून घ्यावे, अशी विनंतीदेखील श्री. खैरे यांनी यावेळी केली. शिवसेनेने मला खूप काही दिले आहे, मी देखील पक्षासाठी मनापासून काम केले आहे. त्यामुळे माझ्या बाबतीत ज्या काही अफवा उठवल्या गेल्या त्यात कुठलेही तथ्य नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मी शिवसेनेतच राहणार याचा पुनरुच्चार देखील खैरे यांनी केला.
हेही वाचा : २४ x ७ उपलब्ध असणारे खैरे नॉट रिचेबल
तीन-चार दिवस माझा फोन बंद होता त्या दरम्यान मी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा अभ्यास करत होतो. महापालिका निवडणुका जिंकून पुन्हा भगवा फडकवण्यासाठीची रणनिती आणि नियोजन यावर विचार करत होतो. मोबाईल बंद असल्यामुळे वरिष्ठ नेत्यांशी संपर्क किंवा बोलण्याचा प्रश्नच नव्हता. कोणाचे मन दुखावले असेल तर त्यांची दिलगिरी व्यक्त करण्यात कोणताही कमीपणा नसल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.
गुडी पाडव्याची मिरवणूक रद्द
मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी १४ वर्षांपासून शहरात मिरवणूक काढली जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या साथीमुळे ही मिरवणूक निघणार नाही. सर्व संप्रदायांच्या मान्यवरांशी चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचे श्री. खैरे म्हणाले. पत्रकार परिषदेला आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती.
क्लिक करा : आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीणमधील शाळाही राहणार बंद
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.