समृद्धी महामार्गात नवनगरांची उभारणी

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : नागपूर-मुंबई या ७०१ किमी लांबीच्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम कोरोनासारख्या संकटाच्या काळातही १६ भागांत सुरू असून १८ हजार कामगार राबत आहेत. आता या महामार्गालगत २० नवनगरांची उभारणी करण्यात येत आहे. त्यापैकी ९ नवनगरांच्या उभारणीला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. भूधारकांचा त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी येथे दिली. 

श्री. मोपलवार यांनी शुक्रवारी (ता.१९) येथील प्रमुख दैनिकांच्या संपादकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. कोरोनाचे संकट आणि त्यानंतरची टाळेबंदी या सर्व पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाच्या कामाच्या प्रगतीसंदर्भात श्री. मोपलवार यांनी माहिती दिली.

समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे ग्रीनफिल्ड प्रकल्प असल्याने शहरापासून दूर प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा कामावर फारसा परिणाम झाला नाही. मेअखेरीस प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांपैकी ४ हजार स्थलांतरित कामगार त्यांच्या मूळ गावी परतले असून त्यांनी प्रकल्पाच्या कामावर परत येण्याची तयारीही दर्शवली असल्याचे श्री. मोपलवार यांनी सांगितले. 

टाळेबंदीचा परिणाम नाही 
समृद्धीच्या कामाचा वेग पाहता पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत हा संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल. तसेच कोरोनामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यताही श्री. मोपलवार यांनी फेटाळून लावली. समृद्धी महामार्गावर एकूण १७०० संरचना (स्ट्रक्चर्स) उभारण्यात येणार आहेत. नाशिक आणि ठाणेदरम्यानच्या पॅकेजमध्ये सर्वात मोठ्या बोगद्याची निर्मिती केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

नवनगरांच्या कामाला प्राधान्य 
समृद्धी महामार्गावर २० ठिकाणी नवनगरांची उभारणी केली जाईल. त्यापैकी वर्धा, वाशीम, बुलडाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन आणि ठाणे जिह्यातील एक अशा ९ नवनगरांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे श्री. मोपलवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रत्येक नवनगरात साधारणतः एक लाख लोकसंख्या असेल आणि सर्व सोयीसुविधा नवनगरांत उपलब्ध असतील. पुढील तीन वर्षांत या ठिकाणी उद्योग-व्यवसाय स्थापन होतील, असा विश्वास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला. 

सौरऊर्जेची निर्मिती आणि धावपट्टी 
समृद्धी महामार्गालगत नैसर्गिक वायूची पाइपलाइन, सौरऊर्जा प्रकल्प, ऑप्टिकल फायबरचे जाळे आदींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार असल्याचे श्री. मोपलवार यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी संरचना नाहीत आणि सलग पाच किमीचा सरळ पट्टा आहे अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरविण्यासाठी धावपट्ट्या उभारण्याचाही मानस असून त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com