इयत्ता पाचवीचा वर्ग जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

varsha gaikwad 19.jpg
varsha gaikwad 19.jpg

औरंगाबाद : राज्य शासनाने १६ ऑक्टोबरला पाचवीचा वर्ग इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळेला जोडण्याचा घेतलेला शासन निर्णय सरकारने तूर्तास मागे घेतलेला आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी शुक्रवारी (ता.१८) जालना येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या शैक्षणिक आढावा बैठकी दरम्यान दिली.

नवीन संरचनेनुसार पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याच्या निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होतील, समायोजनाचा नवीन प्रश्न निर्माण होईल. जिल्हा परीषदेच्या अनेक शाळा मोडकळीस आलेला असताना पाचवीचा वर्ग जि.प. शाळांना जोडणे कितपत योग्य? म्हणून हा निर्णय मागे घेण्यासाठी सर्वच स्तरावरुन मागणी होत असल्याचे आ. विक्रम काळे यांनी शिक्षणमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले होते. 

शासनाने इयत्ता पाचवीचा वर्ग जिल्हा परीषद शाळांना जोडण्याचा आदेश काढला आहे. पंरतू सध्या अनेक जिल्हा परीषदेच्या शाळांना मुबलक खोल्या उपलब्ध नाहीत. ज्या खोल्या आहेत, त्या देखील मोडकळीस आलेल्या आहेत. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही. असे असताना चौथीच्या वर्गाला आणखी पाचवीचा वर्ग जिल्हा परीषद शाळांना जोडणे कितपत योग्य आहे? पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळांच्या लागणाऱ्या सर्व खोल्यांचे बांधकाम करावे, त्यानंतरच नवीन वर्ग सुरु करण्याबाबत विचार करण्यात यावा. तसेच ज्या गावांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परीषद शाळा आहे, तेथील इयत्ता सहावी व सातवीचा वर्ग त्या गावात सुरु असलेल्या संस्थेच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या शाळांना जोडण्याबाबतचा शासननिर्णय सुद्धा मागे घेणे गरजेचे असल्याचे आमदार विक्रम काळे यांनी शिक्षणमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. 

त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पाचवीचा वर्ग जोडण्याचा शासनाने घेतलेला निर्णय आज आम्ही मागे घेत आहोत. तूर्त तो निर्णय स्थगित करून, सर्वांशी चर्चा करून त्यातील इतर सर्व बाबी तपासून पाचवी, सहावी, सातवीचे वर्ग जोडण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगीतले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंटयाल, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती तसेच शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. 

अनुदानित, अंशतः अनुदानित संस्थांकडे भौतिक सुविधा, वर्गखोल्या उपलब्ध असताना विनाकारण तो वर्ग काढून दुसरीकडे स्थलांतरित करणे, त्यासाठी नवीन वर्ग खोली बांधणे हा अनावश्‍यक खर्च कोरोनाच्या काळात योग्य आहे का? इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी टीसी काढून सोयीनुसार इतर शाळेत पाचवीला प्रवेश घेतले असताना सत्राच्या मध्यात हा निर्णय घेऊन विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचा छळ करणे कितपत योग्य? असे प्रश्‍न संस्था, संघटनांकडून उपस्थित करण्यात आले होते. 

(Edit - Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com