भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

Jayasinghrao Gaikwad
Jayasinghrao Gaikwad

औरंगाबाद : एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी (ता.१७) भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून जयसिंगराव गायकवाड यांच्याकडे पक्षातर्फे दुर्लक्ष करण्यात येत होते. यामुळे व पक्षात काम करूनही कोणतीही जबाबदारी न मिळाल्यामुळे हा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत  आहे.


आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी मेलद्वारे राजीनामा पाठवला आहे. माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांना गेल्या १२ वर्षांपासून कोणतीही जबाबदारी देत नाहीत, कामही करू देत नाही म्हणून भाजपला सोडल्याची चर्चा आहे. दरम्यान आज पदवीधर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने जयसिंगराव गायकवाड हे पदवीधर निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्जही मागे घेणार असल्याची माहिती त्यांचा मुलगा राजू गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच पक्षातर्फे जयसिंगराव गायकवाड यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमातही व्यासपीठावर जयसिंगराव गायकवाड यांना स्थान देण्यात आले नव्हते. यासह सर्वांचा नामोल्लेख घेत असताना जाणीवपूर्वक जयसिंगराव गायकवाड यांच्या नामोल्लेख टाळण्यात आला. एवढेच नव्हे तर पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुक असलेले व तिकीट न मिळालेले प्रवीण घुगे किशोर शितोळे यांची वरिष्ठ व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी समजूत काढली. मात्र श्री.गायकवाड यांना कोणताही संपर्क पक्षातर्फे करण्यात आला नव्हता. त्यांनी लोकसभेसाठी हीच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यावेळी भाजपतर्फे ते प्रमुख दावेदार होते. मात्र युती झाल्यामुळे वरिष्ठांच्या सांगण्यावरून त्यांना माघार घ्यावी लागली होती. मात्र पदवीधर साठी इच्छुक असूनही त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र यात उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून पक्ष आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सुरु केले होते. त्यामुळे आज त्यांनी पक्षाकडे राजीनामा पाठवून आपली नाराजी व्यक्त केली.


पक्षासाठी मोठा धक्का
जनसंघापासून तर आताच्या भाजपपर्यंत पक्षात सक्रिय राहिलेले केंद्रात दोनवेळा राज्यमंत्री, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात दोनदा आमदार म्हणून काम केलेले व पक्षाच्या मराठवाड्यातील जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे जयसिंग गायकवाड भाजपमधून बाहेर पडल्यामुळे पक्षाला हा मोठा धक्का समजला जातो.

पक्षात राहून काय करू 
भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जयसिंगराव गायकवाड म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मी पक्षाकडे जबाबदारी मागत होतो. अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांची ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केले. फोन केले पण माझे फोन घेतले गेले नाही. मग अशा पक्षात राहून मी काय करू? शहरात राज्यस्तरावरचे नेते येऊन जातात, पण कधी मला बोलावले जात नाही, सन्मानाची वागणूक दिली जात नाही. मग या पक्षात राहून मी काय करू असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडतो. मराठवाड्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपला वाढवण्याचे काम मी केले, असे श्री.गायकवाड म्हणाले. मुंडे-महाजन नेहमीच आपल्या भाषणातून जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे प्रोड्युसर आहेत असं सांगायचे. आम्ही त्यांनी तयार केलेले उत्पादन मार्केटमध्ये विकतो, मार्केटिंग करतो, असे ते मोठेपणाने सांगायचे. महाराष्ट्रात भाजप खिळखिळी झाली आहे. त्याची बांधणी करण्याची तयारी मी पक्षाकडे दाखवली होती. मात्र पक्षाकडून मला कुठल्याही प्रकारची संधी किंवा सन्मानाची वागणूक दिली गेली नाही. त्यामुळे आता या पक्षात राहण्यात अर्थ नाही, असेही त्यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com