Lockdown : व्यापाऱ्यांकडून थेट बांधावरच भाजीपाल्याची खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - लॉकडाउनच्या काळात बहुतांश शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी घरोघरी जाऊन भाजीपाला विकण्याचा यशस्वी प्रयोग केला. मात्र, वाढलेले लॉकडाउन, उन्हाळी परिस्थिती यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आता व्यापारी थेट बांधावर येऊन भाजीपाला खरेदी करीत आहेत. बांधावरच व्यापारी येत असल्याने शेतकऱ्यांचा ही आर्थिक फायदा होत आहे. आतापर्यंत व्यापारी फळेच बांधावर येऊन खरेदी करीत होते. मात्र, आता व्यापारी परिसरातील गावात जाऊन सर्व प्रकारच्या भाज्या खरेदीसाठी एका शेतातून दुसऱ्या शेतात फिरताना दिसताहेत. 

औरंगाबाद शहराच्या परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होते. मात्र, दोन महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने भाजीपाला विक्री करताना अनेक शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागला. त्यातच शहरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने डोअर टू डोअर भाजीपाला विक्री करण्यासही मर्यादा आल्या. बाजार समितीत सुरवातीला भाजी विक्री केल्यानंतर तेथे फक्त होलसेल मार्केट सुरू राहिले. प्रशासनाने सुरवातील काही ठिकाणी मैदानात भाजी विक्री करण्यास परवानगी दिली; पण यामध्ये सुसूत्रता नसल्याने शेतकऱ्यांना भाजी विक्री करताना अडचणी आल्या. त्यांना एका मैदानातून दुसऱ्या मैदानात जावे लागले. भाजी विक्री करताना गर्दी होत असल्याने काही स्थानिकांचा विरोधही पत्करावा लागला. 

आता उन्हाळ्यात भाजीपाल्याचे उत्पादन कमी असते. त्यातच परजिल्ह्यातील भाजीपाल्याची आवक अतिशय कमी आहे. त्यामुळे शहरात भाजीपाला कमी प्रमाणात आला. शहरात कडक लॉकडाउनमुळे भाजी विक्री करण्यास सहा दिवस अडचणी आल्या. त्यानंतर आता व्यापारी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून भाजीपाला खरेदी करीत आहेत. 

कामगारांना पूर्ण पगार मिळालाच नाही, कोर्टाचे दरवाजे ठोठावले अन...
 
जागेवर शेतकऱ्यांना पैसा 
व्यापारी शेतात आल्यावर ते कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, चुका अशा भाज्यांची खरेदी करीत आहेत. या भाज्या शेतकऱ्यांनी काढून तसेच त्यांना मोजून दिल्यावर ठरलेल्या दरानुसार व्यापारी शेतकऱ्यांना जागेवरच पैसा देत आहेत. व्यापाऱ्यांना किती भाजी लागणार आहे ते शेतकऱ्यांना फोन करून सांगतात त्यानंतर शेतकरी ठरलेल्या वेळेत भाजी काढून तयार ठेवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा बाजारात जाण्याचा खर्च तर वाचतो शिवाय गर्दीपासूनसुद्धा त्यांचे या संकट काळात बचावा होतोय. आतापर्यंत फळे खरेदीसाठी व्यापारी येत होते. मात्र, आता भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या संख्येने व्यापारी बांधावर येण्यास सुरवात झाली आहे. 

आमच्याकडील कोथिंबीर व्यापाऱ्यांनी घेतली आहे. आम्ही त्यांच्याशी बोलून दर ठरतो. ठरलेल्या वेळेप्रमाणे त्यांना कोथिंबीर मोजून देतो. त्यासाठी व्यापारी जागेवरच आम्हाला पैसे देतो. 
- नितीन गाडेकर, शेतकरी 

व्यापारी अगोदर शेतात येऊन भाजी बघतो. चांगल्या प्रतीची भाजी असल्याने दर ठरतो. त्यानंतर तो फोन करून किती भाजी हवी हे अगोदर सांगतो. त्यानंतर भाजी काढून ठेवली जाते. सध्या संकटाच्या काळात हा प्रयोग चांगला आहे. विशेष म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांचा वेळसुद्धा वाचतो. बाजारात जाण्याची गरज राहत नाही. 
- रामेश्‍वर पळसकर, शेतकरी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com