कोविड चाचणी नाही तर शिक्षकांना शाळेत 'एन्ट्री' नाही 

covid test.jpg
covid test.jpg

औरंगाबाद : सर्व शाळा, महाविद्यालयांनी पालक व विद्यार्थ्यांना आरोग्य, सुरक्षेविषयक केलेल्या तयारी बाबत अश्वस्त करावे. पालकांच्या संमतीने विद्यार्थ्याना शाळेत येण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, मुलांना उपस्थितीसाठी कोणतीही सक्ती करू नये. मुख्याध्यापकांनी शालेय परिसर, वर्गखोल्या, आसन व्यवस्था नियमित स्वच्छ, निर्जंतुकीकरण करून घ्यावे. नववी ते बारावीच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सोमवारपुर्वी (ता.२३) कोविड चाचण्या कराव्यात, आशा सूचना शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी चव्हाण यांनी वेबनार बैठकीत सर्व शाळांना दिल्या.

राज्य शासनाने सोमवारपासून (ता. २३) नववी ते बारावीचे शालेय सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने बुधवारी (ता.१८) मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, संस्थाचालक यांची शिक्षण विभागातर्फे वेबमिटींग घेण्यात आली. 

यावेळी डॉ. चव्हाण म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउननंतर मुलांसाठी शाळा सुरू होत आहे. त्यासाठी मुलांची सुरक्षा व आरोग्यविषयक काळजी घेऊन मुख्याध्यापक, शिक्षकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, त्यानुसार स्वच्छता व आरोग्य विषयक बाबींची सर्व तयारी करावी. शाळांना 
कोरोना नियमावलींचे पालन करीत सोमवारपासून जिल्ह्यातील शासकीय, मनपा, जिल्हा परीषद, नपा, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अशा सर्व माध्यमांच्या नववी ते बारावीपर्यंतच्या एक हजार ७८६ शाळा, ४३७ कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, कोरोना संसर्ग अद्यापही कायम असल्याने पालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. 

जिल्हाधिकारी व राज्य शासनाकडून कोरोना नियमावलींचे पालन करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत एचआरसीटी तपासणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण अकरा हजारांपेक्षा जास्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मंगळवारपासून (ता.१८) सरकारी यंत्रणेकडून मोफत कोविड चाचण्या करण्यात येत आहे. त्या शिवाय शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करणे, नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गखोल्या नियमित सॅनिटाईझ करणे अशा आरोग्याबाबत सर्व दक्षता घेणे सक्तीचे असणार आहे. या वेबमिटींगमध्ये शिक्षण उपसंचालक मधुकर देशमुख, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांच्यासह ५५० पेक्षा अधिक मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी झाले होते. 

शाळांसाठी मार्गदर्शक सूचना :

  •  शाळांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे 
  •  बाधितांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच मिळणार शाळेत प्रवेश 
  •  शाळेत आपत्कालीन गट, स्वच्छता गट स्थापन करणे 
  •  शाळेतील परीपाठ, क्रिडा यासह इतर तत्सम कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध 
  •  विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत पालकांची लेखी संमती घेणे 
  •  एका बाकावर फक्त एकच विद्यार्थी बसणार 
  •  विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या अध्यापनावर सर्वाधिक भर 

विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळा 
विद्यार्थ्यांना शाळेत दिवसाआड प्रवेश देण्यात येणार आहे. शाळेत ५० टक्के, तर घरी ऑनलाईन शिक्षणासाठी ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. नववी ते बारावीपर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करताना पालकांना सोबत यावे लागणार आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com