अख्ख्या गावात राहील्या पाचच ज्येष्ठ महिला!  

jarandi2.jpg
jarandi2.jpg

जरंडी  (औरंगाबाद) : कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर दिवाळी सणाचे वेध लागले असताना दुसरीकडे मात्र आदिवासी रामपूरवाडीतील अख्खे गावच ऊसतोडीवर गेल्याने या गावात केवळ पाच वृद्ध महिला राहत आहेत. ग्रामस्थांनी ऊसतोडीवर जाण्याचा निर्णय घेतला अन् घरांना कडीकोयंडा व बांबूचा आधार देत घर उघड्यावर सोडून ऊसतोडीसाठी अख्खे गावच गेल्याने या गावाची सुरक्षा केवळ पाच वृद्ध महिलांवर आहे. या आदिवासी गावात दिवाळी सण साजरा होणार नाही. 

सोयगाव तालुक्यात रामपूरवाडी हे ४३६ लोकसंख्येचे आहे. या गावाला कोरोनापासूनच दृष्ट लागली होती. कोरोना काळात चक्क या गावातील ग्रामस्थांना पाण्यावर जीवन जगावे लागले होते. आता मात्र मायापुंजीच नसल्याने अख्खे गाव ऊसतोडीवर गेल्याने गावात पाच वृद्ध महिला वास्तव्यास आहेत. काही कुटुंबीय तर बांबूच्या काठीवर घरांची सुरक्षा करून ऊसतोडीवर गेले आहेत. गावात कोणताही शासकीय अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही. आर्थिक चणचणीत आलेल्या आदिवासी मजुरांना घर सोडावे लागले. या परिसरात शासनाने रोजगार हमी योजनेचे कामे हाती घेतली असती तर या आदिवासी तांड्याचे स्थलांतर थांबले असते, अशी प्रतिक्रिया आदिवासी मजुरांनी दिली आहे. 

एका भाकरीवर जगते! 
गावात गेल्यानंतर एक आजी म्हाळसाबाई पवार (वय ८७) यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की घरात कुणीच नाही, पदरात पैसा नाही. दिवसभर एका भाकरीवरच जगते. या आदिवासी गावाकडे शासकीय यंत्रणांचे मात्र सोयिस्कर दुर्लक्ष होत असल्याचे या सर्व गोष्टीवरून जाणवते. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com