एसटी कर्मचारी झाले हतबल; पुन्हा दोन महिन्याचे वेतन रखडले   

st 22.jpg
st 22.jpg

औरंगाबाद : लॉकडाऊमुळे उपासमार एसटी कर्मचाऱ्यांची पाठ सोडण्यास तयार नाही. कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न गेल्या तीन महिन्यापासून कसाबसा मार्गी लागला. मात्र आता पुन्हा जुलै आणि आँगस्ट महिन्याचे वेतन थकल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. 

कोरोनामुळे २३ मार्च २०२० पासून एस.टी. बस सेवा बंद होती. तब्बल पाच महिन्यानंतर ही सेवा २० आँगस्ट पासून सुरु झाली. बंदच्या काळात महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडाले. बंदच्या एकूण काळात २३०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. एसटीच्या अनेक चुकीच्या धोरणांमुळे संचित तोटा ६१५५ कोटी रूपये इतका झाला आहे. महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्रत्येक महिन्याला २४९ कोटी रूपये लागतात. एसटीकडे असलेल्या विविध योजनांच्या परिपूर्तीपोटीची शासनाकडे असलेल्या थकबाकीपोटी शासनाने मार्च महिन्यात १५० कोटी रुपये दिले. त्यानंतर एप्रिल मध्ये २५० कोटी, मे मध्ये २७० कोटी दिले. जुलै अखेर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५५० कोटी रूपयांचा निधी सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी अग्रिम म्हणून देण्यात आला. त्यामुळे या रकमेतून एसटी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे उर्वरीत २५ टक्के, मे महिन्याचे ५० टक्के, व जून महिन्याचे संपूर्ण वेतन देण्यात आले. असे असले तरीही पुन्हा जुलै आणि आँगस्ट या दोन महिन्याचे वेतन थकलेले आहे. 

असे होईल शक्य
सध्या शासनाकडे एसटी महामंडळाचे पोलिस, न्यायालयांच्या वॉरंट तिकीटांचे १४७ कोटी थकलेले आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात एसटीने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार महामंडळाने हजारो कामगारांना विविध राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडले आहे. ही मदत व पुर्नरवसन विभागाकडे असलेली थकबाकी ९४ कोटी ९६ लाख इतकी आहे. दोन्ही मिळून शासनाकडे २४२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम शासनाने दिली तर जुलै महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटू शकतो. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात दिलेल्या ५५० कोटीतील शंभर कोटी महामंडळाकडे शिल्लक आहेत. त्यातच आता एसटी सुरु झाल्याने महामंडळाकडेही साधारण शंभर कोटी रुपये उत्पन्न आलेले आहे. या रकमेतून आँगस्ट महिन्याचेही वेतन होऊ शकते अशी कर्मचाऱ्यांची धारणा आहे. 

एसटी महामंडळाने शासनाकडे तीन हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पात तरतुद करुन ही रक्कम शासनाने दिली पाहिजे. 
मुकेश तिगोटे सरचिटणीस महाराष्ट्र वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com