थेरगावच्या शेतवस्तीवर जीवघेणा खेळ! नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या नशीबी यातनाच.

SHETWASTI.jpg
SHETWASTI.jpg

पाचोड (औरंगाबाद) : पावसाळ्याच्या चार महिन्यानंतरही यंदा परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र नदी-नाल्याना पुर येऊन अद्याप पाणी वाहत आहे. शेतवस्तीवरील नागरिकासह विद्यार्थ्यांना वाहत्या कमरें इतक्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करून शाळेसह दैनंदिन गरजा पूर्ततेसाठी गाव गाठावे लागत असल्याचे चित्र थेरगाव (ता. पैठण) सह कडेठाण तांड्यावर पाहावयास मिळते.

दहा वर्षापूर्वी शासनाने गाव तेथे एसटी आणि वस्ती व शेत तेथे शिव व पाणंद रस्ते योजना कार्यान्वित करून रस्ते अभियान राज्यभर राबविले. मात्र या योजना गरजूपर्यंत पोहचल्याच नाहीत. त्यामूळे कित्येक शेतात वास्तव्य करुन राहणाऱ्या नागरिकांसह त्यांच्या पाल्यांना शिक्षणासह विविध गरजा भागविण्यासाठी गावांत येताना अनेक संकटाचा सामना करत गाव गाठावे लागते. यांत सर्वाधिक त्रास शेतवस्तीवरील विद्यार्थ्यांना होतो. याचा प्रत्यय थेरगाव व कडेठाण येथे पाहावयास मिळतो.
 
थेरगाव येथील गाडे-कोल्हे व उबाळे कुटुंबीय अनेक वर्षापासून शेतात वास्तव्य करून राहतात. गाव व वस्तीच्या मध्यभागी मोठी नदी असून त्या वस्तीपर्यंत कच्चा रस्ता आहे. अनेकदा या वस्तीवरील नागरिकांनी पक्क्या रस्त्याची मागणी करूनही त्यांची मागणी कोणी फारशी गांभीर्याने घेतली नाही. मात्र गतवर्षी समाजसेवक डॉ. धोंडीराम पुजारी यांनी स्वखर्चातुन जेसीबीद्वारे रस्ता तयार करुन दिला. पंरतु या वस्तीवरील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पावसाळा सुरु होताच हिरावला गेला.

पावसाळ्याचे पाच महीने उलटले तरी ग्रामस्थांसह विदयार्थी चिखल व पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत शाळा व गाव गाठावे लागते. रस्त्यासाठी प्रशासनाकडे मागणी करुनही काही उपयोग न झाल्याने आता हे ग्रामस्थ, विदयार्थी जाम वैतागले असून रस्त्यासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. जेव्हा विद्यार्थी शिक्षणासाठी नदीच्या पाण्यातून वाट काढत गाव गाठतात तेव्हा घरी येईपर्यंत त्यांच्या पालकाच्या मनात चिंता लागून असते. 

कडेठाण तांडा येथील विद्यार्थांना चौथी इयत्ते नंतरचे शिक्षण घेण्यासाठी कडेठाण येथील शाळेत जावे लागते. तिथे तीन तांडे असून तिन्ही तांड्यावर प्रत्येकी तिस-चाळीस कुंटुब आहेत. या तांडयाना जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने पाण्याशी दोन हात करून विद्यार्थ्यांना पाण्यातून प्रवास करून शाळेत जावे लागत असल्याची शोकांतिका आजही पाहायला मिळते. या तांड्याच्या व कडेठाण गावाच्या मधोमध नदी असल्यामुळे पावसाळा सुरू होताच नदीतुन पाणी वाहते त्या पाण्यातून रस्त्याचा अंदाज घेत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना वाट काढावी लागते. 

विद्यार्थी आपली दप्तरे कशीबशी सांभाळत डोक्यावर घेऊन या पाण्यातून शाळेत जातात. त्यांना ओल्या गणवेशातच वर्गात शिक्षण घ्यावे लागते. थेरगाव व कडेठाण तांडयावरील विदयार्थींना रस्त्याअभावी वाहत्या पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागत असल्याने विद्यार्थी वाहून जाण्याची भीती पालकांना लागून राहते. शाळेची ओढ लागलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी एकमेकांचा हात धरून पाण्यातून वाट काढत शिक्षण घेत आहेत. थेरगाव येथील गाडे-उबाळे शेतवस्तीवरील शंभरावर तर कडेठाण येथील तिन्ही तांड्यावरील सुमारे १५० विद्यार्थी नदीच्या पाण्यातून त्या त्या गावांतील जिल्हा परिषद शाळेत जातात. तर काही विद्यार्थी पाचोड, पैठण येथील विद्यालयात नदीओढे पार करून जातात. या तिन्ही तांड्यावरील विद्यार्थ्यांना नदीनाल्यांच्या पुराचा सामना करावा लागतो. सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतर या विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागतो. भर पावसाळ्यात नदीत वाहणाऱ्या पाण्यात पडून जीवित हानी होण्याची शक्यता नागरिकाकडून व्यक्त केल्या जात आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com