वर्ष सरले, फडणवीसांचे सरकार नाही आले : जयंत पाटील यांचा टोला

jayant patil.jpg
jayant patil.jpg

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सरकार खाली खेचणार, असे देवेंद्र फडणवीस दर तीन महिन्यांनी म्हणतात. हे सांगितल्याशिवाय त्यांचेच सैन्य त्यांच्याबरोबर राहत नाही, ही खरी त्यांची अडचण आहे. आपले सरकार येणार असे सांगत सांगत आता वर्ष सरले; पण फडणवीस यांच्या सरकारचा पत्ता नाही. आता पुढील चार वर्षे कशी जातील हे त्यांना कळणारही नाही, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लगावला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (ता. १२) येथे झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले, सामान्यांच्या नजरेत भाजपचा खरा चेहरा समोर आला. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार स्थापन व्हावे, ही जनभावना झाली. महाविकास आघाडीचे बळकट सरकार उत्तम काम करीत आहे. गत पाच वर्षांत सामान्य माणूस, बेरोजगार, शेतकरी भरडला गेला. या घटकांसाठी उपाययोजना करताना कोरोनाने आघात केला. परिणामी व्यवहार ठप्प झाले. आर्थिक संकटे आली, आव्हाने समोर आली. त्यातून सरकार मार्ग काढीत आहे. केंद्र सरकारने आता कोरोनासंदर्भातील मदत कमी केली आहे. त्यामुळे प्रश्‍नांवर मार्ग काढताना काही अडचणी येत आहेत. ही कसर आगामी काळात भरून काढू. 

नाथाभाऊ कंटाळले होते 
खोट्या आश्‍वासनांना कंटाळून नाथाभाऊंनी भाजपचा त्याग केला. पुढच्या काळात आणखी काही लोक भाजपमधून बाहेर जाताना दिसतील, असे पाटील म्हणाले. 

चव्हाणांनी सोडविले अनेक प्रश्न 
या मतदारसंघात सतीश चव्हाण यांनी २००८ व २०१४ मध्ये विजय मिळविला. २०१४ मध्ये पहिल्या पसंतीची ५४ टक्के मत मिळवून ते विजयी झाले होते. केवळ औरंगाबादचेच नव्हे तर पदवीधर, शिक्षकांचे अनेक प्रश्न‍ त्यांनी सोडविले. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. ७०ः३० फॉर्म्युल्यामुळे मराठवाड्यातील सहाशे विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय प्रवेश मिळत होता. हा फॉर्म्युला चव्हाण यांनी मोडीत काढल्याने आता बाराशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू लागला आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा प्रश्‍न, कृष्णा खोरे, नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याच्या विषयांवरही त्यांनी सभागृहात आक्रमकपणे बाजू मांडली, असे पाटील यानी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोजगार हमी, फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार विक्रम काळे, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदी उपस्थित होते. 

चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज 
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (ता.१२) अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com