
अंबड पोलिसांची कारवाई
अंबड (जि.जालना) : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रवाना शेतशिवारातील शेतकरी गुलाबराव भगवानराव माने यांचे शेतातील कपाशीच्या पिकात गांजाची झाडे लावलेली असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंबड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी या घटनेवर तात्काळ लक्ष केंद्रीत केले. त्यांनी पोलिस पथकासह रवाना येथील शेतकरी गुलाबराव माने यांचे शेतात शनिवारी (28) दुपारी धाड टाकली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
यावेळी कपाशीच्या पिकात असलेल्या तुरीच्या रांगामध्ये लावलेली 58 गांजाची झाडे आढळून आली. तसेच त्याठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या कापसाच्या गंजीत साठवून ठेवलेला दोन गोण्यातील साडे तीन किलो वाळलेला गांजा आढळून आला. तसेच या कारवाई दरम्यान ओला गांजा 68 किलो व वाळलेला गांजा साडे तीन किलो असा एकूण 71 किलो 500 ग्राम गांजा अंबड पोलिसांनी जप्त केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ही कारवाई अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलिस उपनिरिक्षक सुग्रीव चाटे, पोलिस कर्मचारी श्री नारायण शेळके, विष्णू चव्हाण, सतीश देशमुख, महेंद्र गायके, लहाने, जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यातील संशयित गुलाबराव माने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
(संपादन-प्रताप अवचार)