औरंगाबाद पदवीधर मतदार संघात कोणाचे पारडे राहणार जड, यावर होतेय चर्चा

Aurangabad graduate constituency elections have been declared
Aurangabad graduate constituency elections have been declared

हिंगोली  : औरंगाबाद पदवीधर मतदार संघात कोणाचे पारडे जड राहणार यावर हिंगोली जिल्ह्यात पदवीधरामध्ये चर्चा रंगत आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाला असून, आतापर्यंत ५३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, त्यापैकी ४५ अर्ज वैध तर आठ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

निवडणूक विभागाने कार्यक्रम जाहीर केल्याने दोन नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, तर पाच नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. १२ नोव्हेंबरला छाननी झाली, असता यामध्ये आठ अर्ज अवैध ठरले आहेत. तर एक डिसेंबरला मतदान होणार आहे. 

हिंगोली जिल्ह्यात १६ हजार मतदार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नवखे उमेदवार देखील आपले भवितव्य अजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उभे आहेत. औरंगाबाद पदवीधर हा मतदार संघ हा कोणा एका पक्षाचा बालेकिला किंवा गढ नाही, या मतदार संघात पूर्वी भाजपचे श्रीकांत जोशी निवडून आले, त्यानंतर त्याचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा दुसऱ्या निवडणुकीत भाजपाला सपाटून मार खावा लागला, या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी बाजी मारत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात घेतला.

या निवडणुकीत मागील वेळेस देखील भाजपचे शिरीष बोराळकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता देखील ते या निवडणुकीत पुन्हा आमदारकीचे स्वप्न पाहत उभे आहेत, त्याच बरोबर हिंगोली येथील युवा सेना जिल्हाप्रमुख दिलीप घुगे हे देखील शिवसेनेकडून निवडणूक मैदानात आपले भविष्य अजमविण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होईल, अशी चर्चा होत आहे.

या निवडणुकीत भाजप, सेनेचे मतदान विभागणार असल्याचे बोलले जात आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांनी भाजपच्या उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या पेक्षा प्रचारात बाजी मारली असली तरी दोघांच्या मतदानात फाटा फूट होऊन कोणाच्या पारड्यात भर पडेल असे तर्कवितर्क काढले जात आहेत. आता प्रचारात आघाडी कोणी किती घेतली याला महत्व नसून मतदारांच्या मतावर कौल असणार आहे. तसे पाहता राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी निवडणुकीनंतर पुन्हा एक दोन वेळा वगळता मतदार संघात फिरकले देखील नसल्याने अनेक प्राध्यापक वर्ग नाराज आहे. विना अनुदानित शिक्षकांना अद्याप वेतन मिळत नसल्याने या संघटनांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. 

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ हा मागील १० वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला आहे, कारण या मतदार संघात सेना, भाजपा यांच्यापेक्षा राष्ट्रवादी पुढाऱ्यांच्या शैक्षणिक संस्था अधिक असल्याने याचा फायदा थेट राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळतो का अशी चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप, सेना किंवा अपक्ष उमेदवार यांना अवघड जाते का अशीही चर्चा झडत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com