हतनूर टोल प्रकरण: संघर्ष समितीच्या मागण्यांना केराची टोपली दाखवत उद्या टोलनाका होणार सुरु

kannad toll
kannad toll

कन्नड (जि.औरंगाबाद): धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कामातील त्रुटी दूर केल्याशिवाय टोल सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आण्णा शिंदे यांच्या नेतृत्वात महामार्ग संघर्ष समितीने घेतला होता. त्यानंतर चार दिवसांत सदर मागण्या पूर्ण करू असे आश्वासन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आलं होतं. पण आता या मागण्या पूर्ण न करताच,बुधवारी(ता.17)टोल सुरू करणार असल्याची माहिती समोर आल्याने,संघर्ष समितीच्या सदस्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

या प्रकरणात ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील नेवसे यांनी मध्यस्ती केली होती, म्हणून या प्रकरणात बुधवारी सकाळी अकरा वाजता संघर्ष समितीच्या सदस्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे, कोरोना पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.आण्णा शिंदे यांनी केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हतनूर जवळील टोल वसुली सोमवार(ता.15)पासून सुरू होत असल्याची जाहिरात एका वृत्तपत्रात प्रकाशित केली होती.

त्यानुसार सोमवारपासून टोल वसुली सुरू होणार होती, या मार्गावरील कन्नड आसपास चार अपघात स्थळांबाबत महामार्ग प्राधिकरणाने कोणताही तोडगा न काढताच टोल वसुली सुरू करणार असल्याचे बघून, महामार्ग संघर्ष समितीचे डॉ. आण्णा शिंदे, डॉ. सदाशिव पाटील, अशोक दापकेसह समितीच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत, सदर चार अपघात स्थळांबाबत तोडगा काढून काम केल्याशिवाय टोल वसुली सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला होता.

यावेळी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, बोरगावहून देवगाव व टाकळी व अंधानेरहून कन्नड येण्यासाठी दोन ठिकाणी भुयारी मार्ग आवश्यक असून प्राधिकरणाने या कामांचा प्रस्ताव शासनाला पाठवून त्याची एक प्रत आम्हाला द्यावी. तसेच औरंगाबादहून कन्नडला येताना सेवा ढाब्याजवळ सर्वाधिक अपघात झाले आहेत. याठिकाणी संघर्ष समितीने सुचवल्या प्रमाणे सेवा ढाब्या जवळील कन्नड औरंगाबादहून कन्नड प्रवेश पॉईंट बंद करण्यात यावा. पाणपोई पुलापासून सेवा धाब्याजवळील कन्नड कडे प्रवेश घेण्यात येतो तिथ पर्यंत पूर्वेकडून सर्व्हिस रोड करण्याचे काम करावे. यामुळे औरंगाबादहून तसेच चापानेर, वैजापूरकडून येणारे प्रवाशी पाणपोई पुलाखालून सुरक्षित रित्या कन्नडकडे येऊ शकतील.

तसेच एखादा प्रवासी चुकीन पुलावरून पुढे आला तर त्याला सेवा ढाब्या जवळ कन्नड कडे प्रवेश मिळणार नाही,त्याऐवजी त्याला रेल पुलाखालून मकरंद पूर मार्गे कन्नड कडे येण्याची सुरक्षित सोय होईल.या उपाययोजना मुळे या ठिकाणी अपघातांना आळा बसेल.मात्र प्राधिकरणाने यातील कोणतीही मागणी पूर्ण न करताच टोल सुरू करण्याचे ठरवले आहे.हा कन्नड तालुक्यावरील अन्याय आहे.या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे.

प्राधिकरणाने घाटात बोगद्याचा प्रस्ताव द्यावा:-

यावेळी डॉ.शिंदे म्हणाले की,बोगद्याचा खर्च जास्त असल्याचे सांगून प्राधिकरण जाण्यासाठी सध्या अस्थित्वात असलेला घाटातील मार्ग व येण्यासाठी नागद घाटातील मार्ग असे सुचविण्याच्या तयारीत आहे.मात्र आमचा या प्रस्तावाला विरोध आहे.विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सोबत झालेल्या बैठकीतही त्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बोगद्याचाच प्रस्थाव देण्याचे निक्षून सांगितले आहे.बोगदा झाला नाही तर रेल्वेही होऊ शकणार नाही.औरंगाबाद ते चाळीसगाव रेल्वे लाईन व्हावी यासाठी आम्ही कन्नड परिसरातील एक लाख नागरिकांच्या स्वाक्षरीने निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना देणार आहोत.सध्या स्वाक्षरी मोहीम सुरू असून,कन्नड तालुक्यात आता ही चळवळ उभी राहत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com