टेंभापुरीचे पाणी शिरले शेतात; शेतकरी आक्रमक, शाखा अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी

Aurangabad Breaking News
Aurangabad Breaking News

शेंदुरवादा (जि.औरंगाबाद) : टेंभापुरी मध्यम प्रकल्पातील पाणी गुरुवारी (ता.आठ) सकाळी अचानक सोडण्यात आल्याने टेंभापुरीचा पाणीप्रश्न पेटला आहे. सबंधिताच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोटचाऱ्याची दुरूस्ती न करताच सबंधित विभागाने धरणातून आज गुरूवारी अचानक पाणी सोडण्याची लगीनघाई केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहू लागल्याचा प्रकार सुरू झाला. शेतकऱ्यांनी थेट धरणावर जाऊन सबंधिताच्या नावाने हल्लाबोल केल्याने अखेर वाळूज पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन सुरू केलेले पाणी तातडीने बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.


 याविषयी माहिती की, यंदा वरूणराजाने चांगल्या प्रकारची पर्जन्यवृष्टी केल्याने दहा वर्षांत प्रथमच धरण १०० टक्के भरले. सध्या धरणात ६५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळण्याचे संकेत होते. जवळपास १३ किमीपर्यतचा परिसरातील हजारो हेक्टर जमिनी लाभक्षेत्रात खाली असून धरणाची क्षमता २१.२७ दशलक्ष घनमीटर इतकी असून जवळपास २५ गावांसाठी हे धरण वरदान ठरले आहे. धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण बचाव समितीला मिळताच त्यांनी याविषयी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ता.२४ मार्चला एक निवेदन दिले होते. त्यात म्हटले की, अगोदर धरणाच्या आसपास असलेल्या पोटचाऱ्यांची दुरूस्ती करावी. पाण्याची होणारी नासाडी थाबंवावी आणि त्यानंतरच पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी लेखी मागणी असताना समितीच्या निवेदनाला केराची टोपली दाखवून समितीला विश्वासात न घेता आज गुरूवारी प्रत्यक्षात शाखा अभियंता राजन खापर्डे यांनी ५० क्युसेक्स पाणी सोडले.

पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने दोन तासातच पाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनीत वाहू लागल्या. शेतामधील मातीचा भराव कायमचा नष्ट होत असल्याने शेती नापीक होण्याची भीती शेतकऱ्यात निर्माण झाली. आणि क्षणात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसह नागरिकांनी थेट धरणावर जाऊन सबंधिताच्या विरोधात आवाज उठविला. सदरची माहीती वाळूज पोलिसांना कळताच पोलिस पथकही तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पाणीप्रश्न पेटण्याचे कारण लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने चालू असलेले पाणी लगेच बंद केले. त्यामुळे उपस्थित असलेल्या जमावाने पोलिसांना धन्यवाद देत शाखा अभियंत्यांना निलंबित करण्याच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला.

दरम्यान आज गुरूवारी पुन्हा जिल्हाधिकारी चव्हाण यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. पाणी सोडण्याची घाई करणाऱ्या शाखा अभियंत्याचे निलंबन करत पाण्याची नासाडी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा टेंभापुरी धरण बचाव समितीने  दिला आहे. यावेळी कृती समितीचे राहुल ढोले, योगेश शेळके, सरपंच संतोष खवले, पोलिस पाटील हनुमान ढोले, उद्धव महाराज ढोले, ज्ञानेश्वर इंगळे, संतोष ढोले, साईनाथ ढोले, उपसरपंच ताराचंद दुबिले, संदीप शेळके यांच्यासह शेतकऱ्यांनी आदींची उपस्थिती होती.

संपादन - गणेश पिटेकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com