Aurangabad Lockdown : दुसरा दिवसही कडकडीत बंद; रस्ते पडले ओस, नागरिकांनी दाखविला संयम 

lockdown.jpg
lockdown.jpg

औरंगाबाद : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘हीच ती वेळ’ असा निर्धार शहरवासीयांनी केला असून, लॉकडाउनच्या दुसऱ्या दिवशीही शनिवारी (ता.११) कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्य रस्त्यांसह प्रमुख चौक, बाजारपेठा, गल्लीबोळातही दिवसभर शुकशुकाट होता. दरम्यान, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या काही वाहनधारकांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. अनेकांचे लायसेन्स जप्त करण्यात आले. 

शहरात कोरोनाचा कहर वाढल्यामुळे शुक्रवारपासून (ता.१०) लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या तब्बल सात हजारांवर तर बळींचा आकडा ३४२ एवढा झाल्यामुळे नागरिकांनी कोरोना विषाणूची चांगलीच धास्ती घेतली असून, काल स्वयंशिस्त दाखवत प्रत्येकाने घरात राहणेच पसंत केले. दुसऱ्या दिवशीदेखील शहर कडकडीत बंद होते. 

दूध आणि वर्तमानपत्रांचे वितरण करणाऱ्यांव्यतिरिक्त रस्त्यावर वाहनांची वर्दळ तुरळकच होती. अत्यावश्‍यक सेवा देणारी वाहने अधून-मधून रस्त्यावरून धावत होती. शुक्रवारी पहिला दिवस असल्याने पोलिसांनी दुपारनंतर कोणाला हटकले नाही; मात्र शनिवारी सकाळपासूनच प्रत्येक चौकात वाहने अडवून पोलिस चौकशी करत असल्याचे चित्र होते. विनाकारण बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांवर दंडासह, लायसेन्स जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. गल्लीबोळातून कोणी बाहेर पडणार नाही, याची दक्षतादेखील पोलिस घेत होते. महापालिकेच्या सुमारे चारशे कर्मचाऱ्यांनी शहरभर फिरून पोलिसांना मदत केली. वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष देऊन रात्री उशिरापर्यंत आढावा घेत होते. 

सर्वांनाच विश्‍वास 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर व घरीच राहण्याचे आवाहन शासन-प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे. मात्र, नागरिक घरात बसण्यास तयार नसल्याचे बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीतून वारंवार समोर आले; पण गेल्या दोन दिवसांपासून शहराचे चित्र बदलले असून, नागरिक शिस्त पाळून घरात बसणे पसंत करत आहेत. त्यामुळे आता कोरोनाची साखळी तुटणारच असा विश्‍वास अधिकारी व्यक्त करत आहेत. 

साहेब पोटापाण्याचा प्रश्‍न आहे जाऊ द्या... 
मेहकर येथून मुलाबाळांसह दुचाकीवरुन पुण्याला निघालेल्या एका दाम्पत्याला पोलिसांनी अडविले. या दाम्पत्याकडे पासही नव्हता. मात्र, पोटापाण्याचा प्रश्न आहे, कामावर जायचेय, असे म्हणत या दाम्पत्याने पोलिसांकडे गयावया केली. पोलिसांनाही कळवळा आला व सांभाळून जा असा सल्ला देत त्यांनी या दाम्पत्याला पुढे जाण्यास परवानगी दिली. दुचाकीवर सामानाच्या दोन बॅगा, दोन मुले आणि पती पत्नी असे चौघे जण होते.

संपादन : प्रताप अवचार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com