औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नव्याने करण्यात आलेल्या गट रचनेबाबत अनेक ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. यात फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द हे गाव वडोदबाजार गटातून काढून तळेगाव गटातील पीरबावडा गणात समाविष्ट करावे, अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकू, असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
जिल्ह्यात आता ७० गट व १४० गण झाले असून अनेक गट रद्द होऊन त्यांचे गण झाले आहेत. नव्या रचनेत आडगाव खुर्द हे गाव वडोदबाजार गटात समाविष्ट करण्यात आले आहे. गण रचनेत आडगाव खुर्दचा नव्याने समावेश झाला आहे. मात्र हे गाव तळेगाव गटात पीरबावडा गणात समाविष्ट करावे, असा ठरावच ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला आहे.
आडगाव खुर्द हे गाव पीरबावडा गणापासून अवघ्या दीड किलोमीटरवर असून, आमचे सर्व दळणवळण हे पीरबावडा गावावर अवलंबून आहे. तसेच तलाठी सजा, बॅंक, आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफीस, शाळा, महाविद्यालय आदी सर्व पीरबावडा येथे आहे. त्यामुळे नवीन रचना रद्द करून, गावाचा समावेश पीरबावडा गणात करावा, अशी मागणी सरपंच रामदास जोनवाल, माजी सरपंच काकाजी तुपे, देविदास तुपे, कचरु गाडेकर, गणपत तुपे, साहेबराव तुपे, रमेश तुपे, दादाराव गाडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.