राज्यातील तरुणांसाठी महत्त्वाची बातमी : ‘एमपीएससी’ला डावलले, नोकरभरतीसाठी आता सुधारित पद्धत

image.jpg
image.jpg

औरंगाबाद : शासकीय विभागांतील गट ‘ब’ व गट ‘क’ संवर्गातील पदांची भरती करण्यासाठी आता सुधारित पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समित्या ‘महाआयटी’ मार्फत निवडलेल्या व्हेंडरच्या यादीतून एकाची निवड करून नोकरभरती करणार आहेत. दरम्यान, या प्रक्रियेत ‘एमपीएससी’चा कुठेही उल्लेख नसल्याने आयोगाला डावलण्यात आल्याची नाराजी विद्यार्थ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

एमपीएससी निवड करीत असलेल्या पदांव्यतिरिक्तची नोकरभरती महापरीक्षा पोर्टलद्वारे होत होती. मात्र या पोर्टलविषयी अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर आणि विद्यार्थ्यांनी असंख्य तक्रारी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने ही पद्धत रद्द केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. यादरम्यानच एमपीएससीने गट ‘ब’ व गट ‘क’ संवर्गातील जागा भराव्यात ही मागणी पुढे आली. यातून गैरप्रकारांना आळा बसेल आणि पारदर्शकता येईल, असा सूरही निघू लागला. एमपीएससीनेही शासनाला प्रस्ताव पाठवून यासाठी होकार दर्शविला. परंतु शासनाने १७ ऑगस्ट रोजी याविषयी सुधारित आदेश दिले असून त्यातून एमपीएससीला बायपास केले आहे.

अशी आहे नवीन पद्धत
नव्या निर्णयानुसार, जिल्हा, प्रादेशिक, राज्यस्तरीय निवड समित्यांनी महाआयटीमार्फत निवड केलेल्या व्हेंडरच्या यादीतून एका ओएमआर व्हेंडरची (सेवा प्रदाता) निवड करायची. या व्हेंडरने संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पार पाडायची आहे. निवड समित्यांना समन्वय समिती व निवड समितीच्या अध्यक्षांना समन्वय अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे.

पदांची जाहिरात, निवडप्रक्रिया ते अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे याच्या संचालनाची जबाबदारी संबंधित निवड समितीची राहणार आहे. ओएमआर व्हेंडरकडून संबंधित निवड समित्यांनी पदभरतीसाठीची प्रक्रिया राबवून परीक्षा आयोजित करायची आहे. उमेदवारांकडून स्पर्धा परीक्षांचे अर्ज स्वीकारणे, परीक्षा शुल्क स्वीकारणे, ते तपासणे व त्यावर योग्य ती प्रक्रिया करुन परीक्षेचे प्रवेशपत्र तयार करणे, परीक्षेचा निकाल तसेच शिफारसपात्र ठरलेल्या किंवा न ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करणे आदी कामे निवड समित्यांनी ओएमआर व्हेंडरकडून करवून घ्यायची आहेत. त्यासाठी सामंजस्य करार करावा लागेल.

प्रश्‍नपत्रिकांची जबाबदारी निवड समित्यांवर
पदभरतीतील परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार तज्ज्ञ व्यक्तींकडून प्रश्‍नपत्रिका तयार करून घेण्याची जबाबदारी निवड समिती अध्यक्षांची राहणार आहे. तसेच परीक्षार्थींच्या संख्येच्या प्रमाणात प्रश्‍नसंच आणि उत्तरपत्रिका तयार करण्याची जबाबदारीसुद्धा त्यांच्याकडेच राहणार आहे.

Edited by Pratap Awachar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com