तालुक्यात पावसाचा लहरीपणा
-----
ऑगस्टमध्ये केवळ दोनदा पडला; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट
----
वैजापूर, ता. १ (बातमीदार) ः पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले, तरी वैजापूर तालुक्यात पावसाचा लहरीपणा कायम आहे. जून-जुलैमध्ये शासकीय आकडेवारीनुसार सरासरी पर्जन्यमान पूर्ण झाले असले, तरी अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. ऑगस्टमध्ये तर पावसाने मोठी उघडीप दिली. संपूर्ण महिन्यात केवळ दोनदा पाऊस झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.
२५ जूनला २२, तर २८ जूनला ३० मिलिमीटर पाऊस झाला. या दोन्ही दिवशी काही मंडळांतच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जूनमध्ये अपेक्षित १०२ मिलिमीटरच्या तुलनेत १०९ मिमी पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये १३ दिवस हलका पाऊस झाला. तसेच ८, २२, २४ व ३१ जुलैला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, ऑगस्टमध्ये १ व १८ ऑगस्ट असे केवळ दोन दिवस पाऊस झाला. त्यामुळे जमिनीतील ओलावा घटला आहे. कापसाची वाढ खुंटली असून, मका व सोयाबीन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाचा ताण पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
----
९९ हजार हेक्टरवर मका, कापूस
तालुक्यात यंदा ५५ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रावर मका, तर ४३ हजार १७१ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली. मोठ्या क्षेत्रावर ही पिके असल्याने आगामी काळातील पावसाची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. येत्या आठ दिवसांत मुबलक पाऊस झाला नाही, तर मका, कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
---
((कोट))
तालुक्यात जुलै महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पीक परिस्थिती ठीक होती. मात्र, ऑगस्टमध्ये अत्यल्प पावसामुळे कापूस पिकाची वाढ खुंटली. येत्या आठ दिवसांत मुबलक पाऊस न झाल्यास बहुतांश पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.
- व्यंकट ठक्के, तालुका कृषी अधिकारी, वैजापूर