बीड : आनंदवार्ता..! सहयोग सकाळ परिवाराचा..! बंधारा तुडुंब भरला, ग्रामस्थांचा आनंद गगनाला भिडला 

beed bandhara.jpg
beed bandhara.jpg

बीड : सकारात्मक आणि रचनात्मक पत्रकारिता करणाऱ्या ‘सकाळ’ने जलसंधारणाची कामे करून महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीसाठीही हातभार लावला. असेच देवडीकरांच्या (ता. वडवणी, जि. बीड) दुष्काळमुक्तीवरही बंधाऱ्याच्या माध्यमातून ‘सकाळ’ने कायमचा इलाज केला आहे. यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या मोठ्या पावसानंतर दुसऱ्या वर्षीही बंधारा तुडुंब भरल्यानंतर गावकऱ्यांचा आनंद गगनाला भिडला आहे. 

गावचे भूमिपुत्र आणि पुणे येथील धर्मादाय सहआयुक्त दिलीपराव देशमुख यांचेही गाव दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न साकारले आहे. श्री. देशमुख यांनी ‘सकाळ रिलीफ फंड’मधून बंधारा उभारणीसह नदीचे विस्तारीकरण करण्याची मागणी केली. मागच्या वर्षीच्या (२०१९) उन्हाळ्यात काम सुरू करून जिल्ह्यातील सर्वात मोठा गेटविरहित सिमेंट बंधारा (दोन्ही भिंतीसह ८४ मीटर लांबी व पावणेतीन मीटर रुंदी) उभा राहिला आणि साधारण एक किलोमीटर अंतराच्या नदीचे विस्तारीकरण केले.

या नदीवरील एका बंधाऱ्याचेही पुनरुज्जीवन करण्यात आले. साधारण ९२ हजार क्युबिक मीटर गाळ निघाला. मागच्या वर्षीही पावसाने ओढ दिली; पण शेवटच्या काळात जोरदार पावसाने बंधारा तुडुंब भरला आणि परिसरातील दोन किलोमीटर परिघातल्या विहिरी, विंधन विहिरींची पाणीपातळी वाढली. त्याचे परिणाम उन्हाळ्यातही जाणवले. त्यामुळे साधारण साडेसात ते आठ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता झाली आहे. यामुळे पाझरण क्षमतेमुळे परिसरातील दोन किलोमीटर परीघ क्षेत्रातील विहिरी व विंधन विहिरींना याचा फायदा झाल्याचे सरपंच जालिंदर झाटे म्हणाले. 

ग्रामस्थांचा आनंद गगनाला भिडला 

दुष्काळाने होरपळणारे गाव असले तरी कायम शांतताप्रिय, सामाजिक एकोपा जपणारे आणि कष्टाळू व सकारात्मक वृत्तीचे देवडी गाव आहे. गावाच्या आसपास पूर्वीचा कुठलाही मोठा प्रकल्प नसल्याने सिंचन कमीच आहे. विहिरी आणि विंधन विहिरीही नेहमी जानेवारीतच कोरड्याठाक पडत. मात्र, ‘सकाळ रिलीफ फंड’मधील बंधाऱ्यात मागच्या वर्षी पाणी साचल्याने त्याच्या झिरप्यामुळे मागच्या वर्षी मात्र उन्हाळ्यातही जलस्रोतांना चांगले पाणी राहिले. यंदाही दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसानंतर बंधारा तुडुंब भरला. त्याच्या झिरप्याने लागलीच विहिरी व विंधन विहिरींची पातळी वाढल्याचेही सरपंच झाटे यांनी सांगितले. 

‘सकाळ’ने कायम सामाजिक दायित्व जपले आहे. बंधाऱ्यातील पाण्याच्या झिरप्यामुळे परिसरातील जलस्रोतांचे पाणीही वाढण्यास मदत होऊन गावातील सिंचनासह पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. 
 राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, बीड 

हा बंधारा उत्कृष्ट कामाचा नमुना असून ‘सकाळ’ने जलसंधारणाची कामे करून दुष्काळमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. लोकसहभाग, शासकीय योजना, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात अशी कामे होण्याची गरज आहे. 
 अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड. 


‘सकाळ रिलीफ फंड’मधून माझ्या गावात भव्य बंधारा उभारून नदीचे विस्तारीकरण केले. यामुळे गावकऱ्यांची दुष्काळाच्या झळांतून सुटका झाली. यंदाही बंधाऱ्यात पाणी साठल्यानंतर मला गावकऱ्यांनी लगेच छायाचित्र पाठविले. खूप समाधान वाटत आहे. 
 दिलीपराव देशमुख, धर्मादाय सहआयुक्त, पुणे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com