माजलगाव: तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली परंतु या पावसामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक जाणार की काय अशी भिती निर्माण झाली होती. जिरायती क्षेत्रावर असलेले सोयाबीनचे पीक आले असून माजलगावच्या मोंढ्यात या सोयाबीनला ४५०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळत आहे. दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
अवघ्या नव्वद दिवसांत येणारे पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. मागील वर्षी सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला होता. यावर्षी देखिल सोयाबीनला मोठा भाव मिळणार या आशेने तालुका परिसरातील शेतकऱ्यांनी २२ हजार ७१६ हेक्टरवर सोयाबीन लागवड केली. कपाशीनंतर लागवडीत सोयाबीनचा नंबर लागतो.
परंतु असे असले तरी पावसाने दिलेल्या ओढीने आणि पीक काढणीस आल्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडून हळद्या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर होताना दिसत आहे. अशी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी बरीच उठाठेव करून आता सोयाबीन काढणी सुरू केली आहे. मात्र मोंढ्यातील भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांची आशा फोल ठरली आहे.
मागील आठवड्यात ८४०० रुपये प्रतिक्विंटल असलेले दर अचानक तीन हजाराने कमी झाले आहेत. सुरुवातीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जून, जुलैमध्ये पेरणी केलेल्या सोयाबीनच्या काढणीला सुरुवात केली आहे. मात्र पावसाची शक्यता असल्याने शेतकरी चिंतातुर आहेत. वाढत्या दरामुळे सोयाबीनचा पेरा तालुक्यात वाढला होता परंतु दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.