‘या’ शहरात अवैध खाद्य पदार्थ विक्रिचा व्यवसाय तेजीत

Nanded News
Nanded News

नांदेड : शहरातील विविध चौक व मार्गांवर अवैधरीत्या खाद्यपदार्थांची उघड्यावर मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. मात्र, या भेसळयुक्त पदार्थांच्या तपासणीकडे अन्न व औषध प्रशासन विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौकांत अवैध खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय तेजीत आला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एेरणीवर आला आहे.


शहरातील रेल्वे, बसस्थानक परिसर, डाॅक्टरलेन, क्रिडा संकुलमागील व समोरील परिसर, भाग्यनगर, आनंदनगर रोड, नमस्कार चौक, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट, छत्रपती चौक, मोर चौक अशा विविध चौक व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खाद्य पदार्थांची दुकाने थाटलेली आहेत. अंडा आम्लेट, चायनीज, भेलपुरी, वडापाव, पाणीपुरी, समोसे, आलुगोंडे, कचोरी, पकोडे आदींची विक्री उघड्यावर सर्रासपणे केली जात आहे. यातील बहुतांश हातगाड्या रस्त्याच्या कडेला किंवा ठेले नाली काठावर दुर्गंधीयुक्त परिसरात आहेत.

जिभेची चव पुरविण्यासाठी दिवसभर ग्राहकांची तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी या हातगाड्यांवर दररोज पाहायला मिळते. मात्र, विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांना पोटाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. आरोग्य बिघडण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे शहरातील डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

खाद्यपदार्थ विक्रिचा धंदा तेजित

शहरातील बहुतांश भागामध्ये रस्त्यांचे काम सुरु आहे. या खाद्यपदार्थांवर रस्त्यावरील धूळ, माशांचे थवे बसतात. खाद्यपदार्थांचा दर्जा, वापरण्यात येणारे साहित्य भेसळयुक्त आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी कुठलेही गांभीर्य अन्न व औषध प्रशासन विभाग दाखवीत नसल्याचे शहरात दिसत आहे. हातगाड्या, ठेले, हाॅटेलमधील खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन त्याचा दर्जा तपासणे गरजेचे आहे. मात्र, याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीचा धंदा शहरात चांगलाच तेजीत आल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - असे करा वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण ​

बेरोजगारीचे कारण

नोकरीच्या आशेने काठीण्य पातळीवर उच्च शिक्षण घेऊनही खासगी किंवा शासकीय नोकरी मिळत नाही. परिणामी रोजगाराची मारामार होते. यामुळे हे बेरोजगार चौकात किंवा वर्दळीच्या मार्गांवर हातगाडी लावून उदरनिर्वाह चालवीत आहेत. मात्र, त्यांच्याकडून ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याने याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

आरोग्याचा प्रश्न एेरणीवर
शहरात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची नजर असणे आवश्यक आहे. मात्र, या विभागाकडून काही दिवस मोहीम राबविली जाते. नंतर मात्र ‘जैसे थे’ परिस्थिती होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यासंबंधी कुठलीही विशेष योजना हाती घेतली जात नाही. तसेच ग्राहकांमध्येही खाद्यपदार्थासंबंधी जागरुकता नसल्याने त्यांच्याकडूनही बिनधास्त या उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन केले जाते.
- सुंदरराव रामराव शहाणे (ज्येष्ठ नागरिक)

कमी भावाचे आमीष
शहरातील रेल्वे, बसस्थानकासह इतरही ठिकाणी उघड्यावर अवैधरीत्या खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या विक्रेत्यांकडे महापालिकेचे परवानेही नाहीत. चौकांत समोसे, आलुगोंडे, भजे, कचोरी आदी पदार्थ रस्त्याकडेला काढून विक्री केली जाते. रस्त्यावर असल्यामुळे येथे नेहमी धूळ, माशांचा गोंगाट असतो. मात्र, व्यावसायिक कमी भावाचे आमिष दाखवून ग्राहकांना आकर्षित करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
- राधेश्‍याम अग्रवाल (ज्येष्ठ नागरिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com