ऊसासह इतर पिकांचा ही विचार करा

अतिरिक्त ऊसावर माजी केंदीय कृषीमंत्री शरद पवार यांचा सल्ला
sharad pawar
sharad pawarsakal

जालना/अंकुशनगर : मराठवाड्यासह राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारण म्हणजे शेतकऱ्यांनी विक्रमी ऊस लागवड केली आहे. ऊस हे शाश्वत पीक असले तरी शेतकऱ्यांनी उसासह इतर पिकांचा ही विचार केला पाहिजे असा सल्ला माजी केंदीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला आहे.

अंकुशनगर (ता.अंबड) येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे ६० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेचा इथेलॉन प्रकल्पाचे उदघाटन माजी केंदीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता.१६) झाले. यावेळी सहकार व पणन मंत्री बाबासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकार दांडेगावकर, आमदार रोहित पवार, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत दानवे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख आदींची उपस्थिती होती.

यावेळी श्री. पवार म्हणाले, की साखर कारखान्याना केवळ साखर उत्पादन करून चालणार नाही. ऊसाचा भाव हा साखरेच्या दरावर असतो. परंतु, साखरेसह इथेलॉन आणि वीज निर्मिती केली तर शेतकऱ्यांच्या ऊसाला दोनशे-तीनशे रुपये अधिक भाव देता येतो. ऊस हे पीक शेतकऱ्यांसाठी शाश्वत पीक आहे. पण ऊस शेती ही आळशी शेतकऱ्यांची आहे. सारी काढून ऊस लागवड करून खात टाकून पाणी सोडले की परवा गप्पा मारण्यास मोकळा अशी ही शेती आहे. मागील तीन वर्षांपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यात शेतकऱ्यांना विक्रिमी ऊस लागवड केला.

आज अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. साखर कारखाने चालवणे सोपे नाही. हा अतिरिक्त ऊस महाराष्ट्रातील इतर सर्व कारखाने गाळपास घेऊ जातील, तसे नियोजन झाले असून ऊसाचे एक टिपरू ही शिल्लक राहणार नाही. पण असा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून केवळ ऊस लागवड न करता कपाशी, सोयाबीनसह इतर पिकेही शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

यावेळी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची दुसरी शाखा जालना जिल्ह्यातील पाथरवाला येथे १०८ एकरवर सुरू केली आहे. येथे संशोधनकरून दर्जेदार ऊसाचे बेणे निर्माण केले जाणार आहे. यासाठी गोदावरी नदीचे पाणी आणण्याचे नियोजन केले जात आहे. शिवाय साखर कारखान्यांना कुलशल कामगारांची गरज असून त्या मनुष्यबळाला या ठिकाणी प्रशिक्षण ही दिले जाणार आहे, ही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान समर्थचे तिसरे युनिट उभारणीसाठी २५० ते ३०० कोटी रुपये लागणार आहेत. ७० टक्के कर्ज बँक देईल. परंतु ३० टक्के रक्कम ही शेतकरी व कारखान्याला उभा करावे लागणार आहेत, असे ही श्री. पवार म्हणाले.

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे बोलण्यास उभाले असता एका व्यक्तीने व्यासपीठावर जाण्याचा प्रयन्त केला. यावेळी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.दरम्यान हा व्यक्ती नशेत होता, असे पोलिसांनी सांगीतले.

कोल्हापूर विधनसभा पोटनिवदणूकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार यांचा विजय झाला. जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी म्हटले.

तिसरे युनिट सुरू करणार

कोरोनाच्या संकटातून आपली सुटका झाली आहे. परंतु, अतिरिक्त ऊसाचे संकट निर्माण झाले आहे. मागील तीन वर्षात सलग अतिरिक्त ऊस प्रश्न निर्माण झाला आहे. आज साडेआठ लाख मेट्रीक टन ऊस गाळप करणे बाकी आहे. यातील साडेचार लाख मेट्रिक टन ऊस समर्थचे दोन्ही युनिट जून अखेरपर्यंत गाळप करेल. पण चार लाख मेट्रिक टन ऊस इतर साखर कारखान्याचा देण्याचे साखर आयुक्तांनी नियोजन केले आहे. परंतु, हा प्रश्न दरवर्षी येत असल्याने तिसरे युनिट सुरू करणार आहे. याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याची निवेदना काढल्यानंतर वर्षभरात प्रत्येक दिवशी साडेसात हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे तिसऱ्या युनिटचे काम पूर्ण करू असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी म्हटले.

यंदा ही ऊस अतिरिक्त झाल्याने इतर कारखान्याना हा ऊस द्या लागणार आहे. त्यामुळे सहकार विभागाने वाहतूक अनुदान आणि घट अनुदान द्यावे अशी मागणी श्री.टोपे यांनी केली.सहकारी साखर कारखाने चालविणे हे सोपे काम नाही. या सहकारी साखर कारखान्यांमुळे मुलाच्या शिक्षणांची सोया झाली, नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. सध्याच्या अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्याचे आव्हान आहे. दूरदृष्टी ठेवून समर्थचे तिसरे युनिटचा प्रस्ताव सादर केला आहे. या बाबत राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे सहकार व पाणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटले.

कारखाने ऊर्जानिर्मिती प्रकल्प होणार

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला असून अल्पक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करून गावटोळी निर्माण करून ऊस तोडण्यास मदत केली तर कारखाने वाहने देण्यास तयार असून ऊस गाळप लवकर होईल. दरम्यान साखर कारखाने केवळ साखर निर्मितीचे नाही तर आता वीज निर्मिती, इथेनॉल निर्मीतीचे प्रकल्प होणार आहेत. भविष्यात इंधनासाठी इथेनॉलचा वापर होणार असून करखानेचे ऊर्जानिर्मितीचे प्रकल्प होणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकार दांडेगावकर यांनी म्हटले.

दीड महिना बारामती ऍग्रो तुम्हला दत्तक

बारामती ऍग्रो साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ही ऊस आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ही ऊस आहे. पण आम्ही जालना जिल्ह्यात समर्थच्या कार्यक्षेत्रातील अडीच लाख मेट्रिक टन ऊस घेऊन गेलो आहोत. या शिवाय या भागातील ऊस गाळप होईपर्यंत पुढील दीड महिना बारामती ऍग्रो साखर कारखाना तुम्हाला दत्तक दिला असे आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com