उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहर भारनियमनमुक्त असताना शहरात जवळपास गेल्या दोन-तीन महिन्यापासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराने नागरिकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान शहरात ३३ / ११ केव्ही क्षमतेचे नवीन उपकेंद्र सुरू होऊनही पूर्वीची स्थिती दिसुन येत आहे. दुरुस्तीच्या कामासाठी दर आठवड्याच्या मंगळवारी वीज खंडित केली जाते. शिवाय इतर दिवशीही वीज खंडित होण्याचा खोळंबा सुरूच असतो. शहरात (Umarga) गेल्या तीन-चार महिन्यांपासून अचानक वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांना कसलीही पूर्व सूचना न देता दुरुस्तीची कामे सुरू करणे, अचानक फ्युज जाणे, अधून-मधून कमी दाबाने विज पुरवठा होण्याच्या सततच्या प्रकारामुळे घरातीत विजेचे संच जळणे आदी प्रकार सुरू आहेत. (Continue Electricity Discontinue In Umarga)
नवीन उपकेंद्राचा काय उपयोग?
उमरगा शहरासाठी अतिरिक्त भार वाढल्याने नवीन उपकेंद्राच्या मंजूरीसाठी आमदार ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule) यांनी प्रयत्न केले. आयपीडीएस योजनेअंतर्गत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ३३ / ११ केव्ही क्षमतेची यंत्रणेचे काम उशीरा झाले. या योजनेअंतर्गत मंजुर असलेल्या वीस नवीन रोहित्राची क्षमताही वाढविण्यात आली. उपकेंद्र कार्यान्वित होऊन सहा महिने झाले. मात्र वीजपुरवठ्यात (Osmanabad) सुरळीतपणा येत नाही. दरम्यान शहरातील आण्णाभाऊ साठे चौक ते आदर्श महाविद्यालयापर्यंतच्या दक्षिण व उत्तर भागात नेहमी विजेचा प्रश्न कायम निर्माण होत आहे. महावितरण नेहमी दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा (Electricity) खंडित ठेवते. आणखी किती दिवस दुरुस्तीचे कामे रहाणार आहेत. याची अधिकृत माहिती सांगितली जात नाही.
खांब सिफ्टींगच्या कामातील दोष कुणाचा ?
उमरगा शहरातील अडथळ्यांचे वीजेचे खांबाचे सिफ्टींग करुन नवीन वीज वाहिन्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून २७ लाखांचा निधी महावितरणकडे देण्यात आला होता. या कामात पॉईन्ट एक क्षमतेचा कन्डक्टरची गरज असताना पॉईन्ट ५५ क्षमतेच्या कन्डक्टर वापरण्यात आले. निविदेमध्येच पॉईन्ट ५५ क्षमतेचे कन्डक्टर वापरण्याच्या सूचना होत्या. परंतु आता नेहमी कन्डक्टरचा प्रश्न निर्माण होत असल्याने नवीन कन्डक्टर बसविणे आणि दुरुस्तीचे काम करावे लागते. यात नेमका दोष कुणाचा. अंदाजपत्रक तयार करताना आवश्यक ते योग्य साहित्याचा समावेश करणे गरजेचे असताना तांत्रिक तज्ञाना याचे ज्ञान नसावे कि कमी खर्चात काम आटोपण्याचा प्रयत्न असावा याबाबत सांशकता वाटते.
मग वसुलीचा तगदा कशासाठी ?
ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करणे महावितरणचे कर्तव्य आहे. बहुतांश ग्राहक वीज बिलाचा भरणा वेळेत करतात. काही ग्राहकांची थकबाकीपोटी वीज तोडली जाते. महावितरण वीज बिलाच्या वसुलीचा तगादा लावते. अडचणीत असलेल्या ग्राहकांना अंधारात ठेवते. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते. बहुतांश अधिकारी, अभियंता मुख्यालयी नसतात. ग्राहकांच्या तक्रारीची बेदखल केली जाते. दरम्यान लोकप्रतिनिधींचाही अधिकाऱ्यांवर वचक राहिला नाही. परिणामी त्याचा ग्राहकांना पश्चाताप सहन करावा लागतो आहे.
उमरगा शहरातील वीजपुरवठ्यात सुरळीतपणा येण्यासाठी नवीन उपकेंद्र कार्यान्वित केले आहे. मात्र खांब सिफ्टींगच्या कामातील दोष निघत असल्याने दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. टप्याप्प्याने कन्डक्टर बदलण्याचे काम करावे लागत आहे.
- आर.एम. शेंडेकर, उपकार्यकारी अभियंता
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.