पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) - कोरोना रोगाने माणसाचे आयुष्यच बदलून टाकले. कोरोनाने मानवास जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवला. दैनंदिन जगत असलेल्या जीवनात आमूलाग्र बदल घडून नवे विचार मानवी जीवनावर झाले आहेत.
माणसातील पद, पैसा, प्रतिष्ठा, गर्व, मीपणा, स्वार्थी वृत्ती या कोरोनाने धुळीस मिळवत केवळ माणूस म्हणून जगायला शिकवले.
हेही वाचा : लॉकडाऊनमध्ये मजुरांच्या हाताला मिळणार काम
चांगले काय, वाईट काय, कशाला महत्त्व आहे, कशाला नाही, याची जाण कोरोनामुळे होत आहे.
स्वच्छ भारत योजनेसाठी शासनाने कोटी रुपये खर्च केले तरीही जागोजागी अस्वच्छता दिसून आली. घरातील कचरा अंगणात, रस्त्यावर टाकणे यामुळे कचऱ्याचे ढीग दिसायचे. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला किती महत्त्व आहे याची जाणीव सर्वांना होत आहे. शहर असो की ग्रामीण भाग, स्वच्छ दिसू लागला आहे.
दैनंदिन जीवन जगत असताना पैशाला कवडीमोल समजले जायचे. अनेकदा पार्टी, समारंभ, हॉटेलात जेवणे, छोट्या-छोट्या कार्यक्रमांत पैसा खर्च करणे असे प्रकार सतत पाहायला मिळत होते. मात्र कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर अनेकांच्या पैशाचे स्रोत बंद झाले. येणारा पैसाही मंदावला. तेव्हा पैशाची खरी किंमत अनेकांना कळून आली.
हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील
शिवाय लॉकडाउनमुळे केवळ जीवनावश्यक बाबींवरच खर्च होत असल्याने अनेकांना अनावश्यक बाबींवर केली जाणारी पैशाची उधळपट्टी जाणवली. आज प्रत्येकजण पैसा खर्च करताना जपून व काटकसरीनेच करताना दिसत आहे.
बरेचसे गावाकडील ग्रामस्थ पैसा कमाविण्यासाठी शहरात गेले. अनेकांनी शेती विकून टाकली. शहरी भागात रोजगार, नोकऱ्या केल्या. आता लॉकडाउनमुळे शहरी भागाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या, तर ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सुरक्षिततेचा प्रत्यय आला. सध्या शेतीमालाचे आणि एकंदरीत शेतीचे महत्त्वही अधोरेखित झाले. हाच शेतीमाल साऱ्यांचे पोट भरत आहे.
आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करणारे अनेकजण कोरोनामुळे आता सजग झाले आहेत. आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशासेविका यांचा सल्ला ग्रामस्थ गंभीरपणे ऐकत आहेत. वेळोवेळी हात धुणे, दररोज स्वच्छ कपडे घालणे, अंघोळ करणे, मास्क वापरणे आदी गोष्टीही आरोग्याच्या दृष्टीने केल्या जात आहेत.
कोरोना विषाणू रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले. यामुळे बार, दारू दुकाने, गुटखा, तंबाखू विक्रीची दुकाने बंद करण्यात आली. अनेकांना व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव झाली. बार, हॉटेल, पार्ट्या यामध्ये घालवला जाणारा वेळ आता आपल्या परिवाराबरोबर अनेकजण घालविताना दिसत आहेत. अनेकांनी व्यसनमुक्तीचा संकल्पही केलेला आहे.
कोरोनामुळे आरोग्याचे महत्त्व कळाले. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सर्वसुविधांयुक्त असावी याची जाणीव झाली. पुढील काळात ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम कशी करता येईल याबाबत लक्ष राहणार आहे. मोठ्या गावांतील आरोग्य केंद्राला अद्ययावत अशा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करता येईल.
- राजेंद्र देशमुख,
भाजप तालुकाध्यक्ष, भोकरदन
गावात स्वच्छता सुरूच असते. घंटागाडीही सतत सुरू असते. ग्रामस्थांनाही आता कोरोना रोगामुळे स्वच्छतेचे महत्त्व पटले आहे. शिवाय ग्रामपंचायतीतर्फेही धूरफवारणीसह स्वच्छतेलाच अधिक महत्त्व दिले जात आहे.
- अर्चना देशमुख, सरपंच
कोरोनामुळे ग्रामीण जीवन तसेच शेतीचे महत्त्व पुढे आले. शेतीतून आपण अन्न पिकवून जगू शकतो, शेती किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव झाली आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी कधीही उपाशी राहू शकत नाही, हे लक्षात आले.
- रावसाहेब बावस्कर, शेतकरी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.