छत्रपती संभाजीनगर : पुढील महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा जोरात अभ्यास सुरु आहे. अशा काळात त्यांना कुठलाही मानसिक त्रास नको असतो. पालकवर्ग याची खबरदारी घेत आहेत. पण या काळात नवीनच टेन्शन विद्यार्थ्यांच्या मागे लागले आहे. ते आहे हॉलतिकीटातील चुकांच्या दुरुस्त्यांचे! सध्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीटांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, शेकडो विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटांवर अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यातील दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर बोर्डाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २४ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी बोर्डामार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मात्र, या हॉलतिकीटांवर अनेक विद्यार्थ्यांच्या नावात व विषयांमध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात अभ्यासाऐवजी बोर्डाच्या चकरा माराव्या लागत आहे. तसेच विषय व नावातील बदलासाठी बोर्डाकडून प्रत्येकी दोनशे रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे चूक बोर्डाची आणि शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना, अशी भावना बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी व्यक्त केली आहे.
ऑनलाइन भरताना ‘पीसीएम’,
हॉलतिकीटावर आले ‘पीसीबी’
याबाबत बोर्डात दुरुस्तीसाठी आलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले, की मी विद्यालयात ऑनलाईन विषयांची माहिती भरताना ‘पीसीएम’ (फिजीक्स-केमिस्ट्री-मॅथ्स्) ग्रुप निवडला होता. मात्र, हॉलतिकीटावर ‘पीसीएम’ ऐवजी बायलॉजी विषय म्हणजे ‘पीसीबी’ (फिजीक्स-केमिस्ट्री-बॉयोलॉजी) ग्रुप आला आहे. जो विषय मी घेतलाच नाही, तो विषय हॉलतिकीटावर छापून आला आहे. ज्याचा मी वर्षभर अभ्यास केला नाही, त्याचा पेपर मी कसा देणार? असा सवाल विद्यार्थ्याने उपस्थित केला.
तसेच आता हा विषयामध्ये बदल करण्यासाठी बोर्डाकडून दोनशे रुपये शुल्क मागितले आहे. शिवाय माझ्या नावात देखील बदल झाला आहे, हीसुद्धा बोर्डाची चूक आहे. नावातील बदल करण्यासाठीही बोर्डाकडून दोनशे रुपये शुल्क घेण्यात आले आहे. ज्या चुका मी केलेल्या नाहीत, अशा चुकांसाठी मला बोर्डात चकरा माराव्या लागत आहे. तसेच अधिकचे शुल्क भरावे लागत आहे. यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ऐन परीक्षा तोंडावर असताना अभ्यास करायला वेळ मिळत नाही. अशा वेळी मला बोर्डाच्या चकरा माराव्या लागत आहे. मंगळवारी (ता.३०) नावात बदल, विषयातील बदलासाठी बोर्डात विद्यार्थ्यांनी रांगा लावल्या होत्या. बोर्डाच्या या धोरणाबाबत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती.
अशा आहेत बोर्डाच्या सूचना
शाळा-महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावी.
प्रिटींगसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये.
प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी.
प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असल्यास त्यांच्या दुरुस्त्या शाळा,
महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात, विद्यार्थ्यांनी नव्हे.
प्रवेशपत्रातील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या
शाळा, महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून एक प्रत मंडळाकडे पाठवावी.
विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा, महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत’ असा शेरा अवश्य लिहावा.
विद्यार्थ्याचे छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शिक्का मारुन त्यावर स्वाक्षरी करावी.
विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटामध्ये नावात, विषयांमध्ये बदल असल्यास शाळा, महाविद्यालयांनी बोर्डाकडून करुन घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्रास देवू नये.
- वैशाली जामदार, सचिव, विभागीय मंडळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.