मुंडे-धस आमने सामने! मिटणाऱ्या ऊस संपातून नव्या पक्षांतर्गत युद्धाचा जन्म!   

pankja munde  suesh dhas.jpg
pankja munde suesh dhas.jpg

बीड : ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही बीडची ओळख नवी नाही. मजुरांचे अनेक प्रश्न असले तरी अधूनमधून त्यांच्या प्रश्नांवर आंदोलने होतात आणि मिटतातही. त्यातून मजुरांच्या हाती काय पडते यापेक्षा त्या काळात राजकारण चांगलेच तापते. यंदाही आंदोलन झाले आणि अनेक संघटना, पक्षांच्या नेत्यांनी त्यात उड्या घेतल्या. यावेळीही आता मजुरांच्या हाती ठोस काय लागणार हा प्रश्न अनुत्तरितच असला तरी आजघडीला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि पक्षाचेच आमदार सुरेश धस यांच्यात निर्माण झाला संघर्ष हेच या आंदोलनाचे फलित म्हणावे लागेल. 

बीड जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाची पाने उलगडली तर दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांतील युद्धापेक्षा पक्षांतर्गत कुरबुरी आणि युद्ध अधिक पहायला मिळते. अगदी ७० - ८० च्या दशकात एकत्र असलेले द्वारकदास मंत्री व श्रीपतराव कदम केशरबाई क्षीरसागर यांच्या विरोधात असत. पुढे याच काँग्रेस पक्षातील शिवाजीराव पंडित व केशरबाई क्षीरसागर यांच्यातील गटबाजीही जिल्ह्याने पाहिली. त्याकाळी शेतकरी कामगार पक्ष व कम्युनिस्ट पक्ष ताकदवान असले तरी राजकीय ताकद व संस्थांवर वर्चस्व काँग्रेसचे असे आणि त्यातून पक्षीय युद्ध पेटलेले असे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय उदयानंतर जिल्ह्यात भाजपने हळूहळू बाळसे धरले. त्यांनी मात्र विरोधाच्या राजकारणापेक्षा कायम बेरजेचे राजकारण केले. तेव्हाची काँग्रेस आणि नंतरच्या राष्ट्रवादीतून त्या - त्या परिस्थितीत कधी बाबूराव आडसकर, राधाकृष्ण होके, अमरसिंह पंडित या नेत्यांना बरोबर घेऊन क्षीरसागरांना सत्तेपासून दूर ठेवले. राष्ट्रवादीच्या मागच्या चलतीच्या काळातही जयदत्त क्षीरसागर विरुद्ध अमरसिंह पंडित, सुरेश धस, प्रकाश सोळंके असे चित्र असे. तर, मागच्या वेळी जयदत्त क्षीरसागर विरुद्ध धनंजय मुंडे व सर्व असे चित्र होते. 

जिल्ह्यात सर्वाधिक राजकीय कलगीतुरा रंगतो तो पक्षांतर्गत विरोधामुळे. आता पुन्हा त्याचाच नवा अध्याय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या निमित्ताने पहायला मिळत आहे. गोपीनाथ मुंडे यांना भाजमध्ये विरोध झाला असला तरी जिल्ह्यात पक्षीय विरोध झाला नाही. तोच पायंडा मागच्या पाच वर्षांच्या सत्तेत पंकजा मुंडे यांच्याबाबतीतही होता; पण भाजपच्या सहयोगी पक्षातील विनायक मेटे व त्यांच्यातून कधीही विस्तव गेला नाही. आता त्याच धर्तीवर पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्यात नवा अध्याय सुरू झाला आहे.
 
त्याचे कारण असे झाले, ऊसतोड मजुरांचे नेतृत्व पूर्वी कायम गोपीनाथ मुंडे आणि पुढे पंकजा मुंडे यांनी केले. मुंडे लवादातही आहेत. त्यांच्या सत्ताकाळात झालेल्या संपावेळी संप मिटविताना त्यांनी कारखानदारधार्जिणी भूमिका घेतल्याचा आरोप इतर पक्ष आणि संघटना आजही करत आहेत. यंदाही संप सुरू झाला तेव्हा नेमके पंकजा मुंडे परदेशात होत्या. याचवेळी भाजपने संपाची अधिकृत जबाबदारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यावर दिली. मजुरांना दीडशे टक्के दरवाढ द्यावी, अशी मागणी करत धसांनी भाजपच्या झेंड्याखाली राज्यभर रान पेटविले; पण पंकजा मुंडे यांची भूमिका यात वेगळी दिसली. सुरुवातीला सौम्य वाटणाऱ्या दोघांच्या भूमिका आता तीव्र विरोधी असल्यावर दसरा मेळाव्यात शिक्कामोर्तब झाले आहे.

सुरुवातीला संपात कोणीही लुडबुड करू नये असे पत्रकात म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी मेळाव्यात तर मजुरांचे प्रश्न सोडविणाऱ्यांना उत्तर प्रदेशात पाठवावे लागेल असा टोला लगावला आहे. त्यांनी २१ रुपयांची दरवाढ अपेक्षित धरून कारखान्याला निघा असे फर्मान बजावलेले असताना धसांनीही पुढचे पाऊल टाकत ‘संप आणखी सुरू आहे, येत्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत तोडगा निघेल, तेव्हाच जावे, अशी थेट भूमिका मांडली. या दोन परस्परविरोधी भूमिकांनी रान पेटलेले असतानाच कहर झाला तो धसांच्या मतदारसंघात सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुरू असताना इकडे आष्टीत सुरेश धस यांचा ऊसतोड मजूर व मुकादमांचा मेळावा सुरू होता, या घटनेने. दरम्यान, सुरेश धस हे तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत असताना त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत थेट भाजपला मदत केली. त्यानंतर भाजपने त्यांना लातूर - उस्मानाबाद - बीड मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते आमदार झाले. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com