उदगीर येथे कोरोनाच्या भितीमुळे मास्कचे दर वाढले तिप्पट

Corona News
Corona News

उदगीर : नुकतेच तेलंगणा येथे कोरोना विषाणुचे दोन रुग्ण आढळल्याच्या बातम्यांमुळे उदगीरमध्ये तोंडाला लावण्यात येणारे मास्कचे दर तिप्पट झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी पाच रुपयाला मिळणारे मास्क बाजारातून गायब झाले आहेत. ठोक भावात खरेदी केली तर यापूर्वी तीनशे ते पाचशे रुपये मिळणारे मास्कचे बॉक्सचे भाव आता बाराशे ते पंधराशे झाले आहेत.

संपूर्ण देशभर खबरदारी घेतली जात असताना तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या उदगीरमध्ये याबाबत उपाययोजना आणि रुग्ण आढळलेच तर कितपत तयारी आहे, याचा आढावा घेतला असता डाँक्टरांसह प्रयोगशाळा (लॅब) चालकांना अद्याप शासनस्तरावरून कसल्याही सूचना दिल्या गेल्या नसल्याचे आढळून आले.

उदगीर हे तेलंगणाच्या सीमेवर असलेले शहर. उदगीरमधून रेल्वे आणि एसटी बसच्या माध्यमातून दररोज हजारो प्रवासी आणि व्यापारी तेलंगणा राज्यात जात येत असतात. यामुळे कोरोनाचा धोका आता उदगीरच्या सीमेवर आला आहे. मात्र याबाबत प्रशासकीय बाबतीत कमालीची उदासीनता दिसून येत आहे. कोरोना आजाराची लागण झाली असल्याचा संशय असेल तर या रुग्णाच्या तपासणीसाठी आवश्यक लॅबसुद्धा उदगीरमध्ये नाही. संशयित रुग्णांचे रक्त घायचे का स्वॅब घ्यायचा आणि तो तपासणीसाठी कोठे पाठवायचा या बाबत कसल्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत. यामुळे असा संशयित रुग्ण आढळला तर नेमके काय करायचे याबाबत लॅब चालक आणि खासगी डॉक्टर संभ्रमात आहेत. संशयित रुग्णांसोबत राहणाऱ्या आणि उपचार करणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी या बाबत जनजागृती बाबत सर्वच पातळीवर उदासीनता आहे. तातडीने जनजागृती करून खबरदारीचा उपाय म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आणि संशयित रुग्णाची कशी काळजी घेतली पाहिजे या बाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.

हात स्वच्छ धुणे आवश्यक

जेवन, शिंक आल्यानंतर , खोकल्यानंतर , आजारी व्यक्तीची काळजी घेण्यापूर्वी, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तसेच पाळीव प्राण्यांना हाताळल्यानंतर आणि विष्ठा काढल्यानंतर नागरिकांनी हात स्वच्छ धुवावेत असे आवाहन सामान्य रुग्णालय मार्फत करण्यात आले आहे.

उदगीर येथून दररोज हजारो प्रवाशी तेलंगणात ये-जा करतात. यामुळे उदगीर येथे कोरोना विषाणुची शक्यता लक्षात घेऊन पाच बेडची स्वतंत्र व्यवस्था असणारा कक्ष तयार ठेण्यात आला आहे. संशयित रुग्णाच्या तापसणीसाठीची व्यवस्था नसल्यामुळे स्वॅब शासकीय रुग्णालयामार्फत पाठवून अहवाल निगेटिव्ह आल्यानंरच रुग्णाला घरी पाठविण्यात येणार आहे.साधारण पंधरा दिवस अशा रुग्णाची काळजी घेण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था तयार ठेवण्याबत स्टोअर विभागाला सांगण्यात आले आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून शासन पातळीवरून अद्याप सूचना दिल्या गेल्या नाहीत, एखादा रुग्ण जरी संशयित आढळला तर अफवा पसरू शकतात म्हणून अशी काळजी घेतली जात आहे. कोणालाही सर्दी, ताप खोकला, श्वसनाला त्रास आदी लक्षणे असतील आणि सर्दी ताप कमी होत नसेल आणि तो जर कोरोना विषाणुबाधित रुग्णांच्या संपर्कात आला असेल तरच अशा रुग्णाची काळजी घेणे आवश्यक आहे. इतरांनी अशी लक्षणे दिसली म्हणून घाबरून जाऊ नये. कसलीही शंका असेल तर तातडीने शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा.
- डॉ. शशिकांत देशपांडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय उदगीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com