लातूर भूकंपानंतरची २७ वर्ष ! 

umarga news o4.jpg
umarga news o4.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपाला आज २७ वर्ष पूर्ण होत आहेत. भूकंपात तालुक्यातील अनेक गावे उद्धवस्त झाली. सरकार, सेवाभावी संस्था यांच्या मदतीने टुमदार घरे उभी राहिली, घरात नागरिक राहण्यासाठी गेले. मात्र मालकी हक्कापासून आजही नागरिक वंचित आहेत. दरम्यान भूकंप ही नैसर्गिक आपत्ती. आणि सध्या सुरू असलेले कोरोना संसर्गाची आपत्ती. या दोन्ही बाबी मानवी मनाला वेदना देणाऱ्या आहेत.

भूकंपानंतर नऊ हजार ९७ नागरिक घरासाठी प्राप्त ठरले. आज पर्यंत सहा हजार ५७५ कबाल्याचे (जमिन मालकी हक्क) वाटप करण्यात आले आहे तर दोन हजार ५२२ लाभधारकाना कबाल्याची प्रतीक्षा लागली आहे. कांही दिवसा पूर्वी एक हजार ६२४ लाभधारकाना कबाले मिळावेत म्हणून तहसील कार्यालयातुन जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर उर्वरित ८९८ लाभधारकाच्या त्रुटी असून त्याची पूर्तता झाल्यास कबाले वाटप करण्यात येतील असे महसूल प्रशासनाने कळवले आहे. उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त अ वर्गवारीत एकूण दहा गावे येतात तर ब वर्गवारीत ९ गावे आहेत. या सर्व गावाचे पुनर्वसन झाले आहे त्यात अ वर्गवारीत गावे पेठसांगवी, सावळसूर, नाईचाकुर, कलदेव निंबाळा, बोरी, मातोळा, बाबळसुर, काळ निंबाळा, समुद्राळ, नारंगवाडी आहेत तर ब वर्ग वारीत एकुरगा, येणेगुर, बेटजवळगा, माडज, बलसुर, व्हंताळ, कोराळ, कडदोरा आदी गावाचा समावेश आहे.

घराचे मालकी हक्क नसल्याने अनेक योजनांचा मिळेना लाभ
भूकंपग्रस्तांना पूर्नवसन क्षेत्रात ऐसपैस जागा मिळाली, मोठे रस्ते मिळाले. घराचे कबाले मिळाले मात्र मालकी हक्क नसल्याने अनेक योजनांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येताहेत. पंचवीस वर्षानंतर कुटुंबाचा विस्तार वाढल्याने विभक्त कुटुंबामुळे दुसऱ्या घराचे काम करण्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र मालकी हक्क मिळत नसल्याने घरकुल मंजूर असूनही लाभ मिळणे कठीण झाले आहे. 

भूकंपानंतर कोरोनाची आपत्ती !
भूकंपात जिवीत व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. नात्यातील जिवाभावाची माणसं गेली. त्या वेदनांची आठवण अजूनही कुटुंबातील व्यक्तींना येते. गेल्या सहा महिन्यापासुन कोरोना संसर्गाची आपत्ती अनेकावर येत आहे. उमरगा तालुक्यात अठराशेहुन अधिक कोरोना पॉझिटिव्हची संख्या झाली आहे. पन्नास व्यक्तींना मृत्यूला सामोरे जावे लागले. 

 

" भूकंपात गावातील ७३६ व्यक्ती दगावल्या, त्यांच्या आठवणीचे स्मरण अजुनही होते. पूर्नवसन गावामुळे घराचे घरपणं गेले. रस्ते मोठे झाले परंतू त्याची दुरावस्था दुर करण्यासाठी निधी मिळत नाही. कोरोनाचे संकट सावधगिरीने व उपचाराने घालवू शकतो मात्र भूकंपाच्या संकटाचे भयावह विसारण्यासारखे नाही.

- गणेश पाटील, सरपंच पेठसांगवी

" घराच्या मालकी हक्काचे अधिकार मिळत नसल्याने घरकुलाची उभारणी होत नाही. गावातील प्राथमिक सुविधासाठी विशेष निधी मिळत नसल्याने समस्यांचा ढिग आहे. शासनाने भूकंपग्रस्त भागाच्या विकासासाठी निधीची खास तरतूद करायला हवी.

- प्रभाकर बिराजदार, नागरिक बेटजवळगा
 

(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com