स्मशानभूमीत व्यायाम करा आणि मरणाला जरा थांबवा

file photo
file photo

सेलू (जि.परभणी) : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणस स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागून दुसऱ्यांच्या आधाराने स्मशानभूमीत जावे लागते. मात्र, येथील मॉर्निंग वॉक ग्रुपने अनोखा उपक्रम हाती घेऊन ‘मरणाला सांगतो थांब जरा...’ असे म्हणत स्वतःच्या आरोग्यदायी जीवनासाठी चक्क स्मशानभूमीची निवड केली आहे.

नियमितपणे सकाळी स्मशानभूमीत व्यायाम करून एक वेगळा आदर्श उपक्रम सर्वांसमोर ठेवला आहे. सद्य:स्थितीत माणसांचा बदललेला आहार-विहार, नित्याची धावपळ, आणि केमिकल व रासायनिक खतांचा वाढलेला प्रभाव, यामुळे अनेकांच्या जीवनात अकाली वृद्धापकाळ येत आहे.

वाढत्या वयासोबत वाढते आजार हे सूत्र तयार झाले आहे. यावर मात करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे व्यायाम, चालणे, योगासन हेच असल्याचे सिद्ध झाले आहे. श्री. श्री. रविशंकर,  श्री. रामदेव बाबा, यांनी योगासन, प्राणायाम व व्यायामाचे महत्त्व जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक गावात व प्रत्येक शहरात व्यायाम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

मॉर्निंग वॉक ग्रुपचा उपक्रम

येथील मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य मागील दोन वर्षांपासून नियमितपणे व्यायामासाठी बाहेर पडतात. मागील अनेक महिन्यांपासून सेलू-पाथरी रस्त्यावर धावणारीही मंडळी अचानकपणे तहसील कार्यालय परिसरातील शांतिधाम स्मशानभूमीकडे वळली. आणि भल्या पहाटेपासून स्मशानभूमी समोरील रस्त्यावर ये-जा करू लागली.

त्याशिवाय स्मशानभूमीमधील महादेवाच्या मूर्तीसमोरील जागेत योगासन व प्राणायाम करत आहेत. मशानभूमी म्हटले की, मृत्यूनंतरचा विसावा. किंवा कोणालातरी पोचविण्यासाठी जाण्याची जागा, इतकाच विचार समोर येतो.

परंतु, येथील मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, किशोर जोशी, तहसीलदार बालाजी शेवाळे, पद्माकर जोशी, डॉ. ऋतुराज साडेगावकर, डॉ. सुनील कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, डॉ. विलास मोरे, सुधाकर पवार, दिगंबर पवार, दिलीप सांगतानी, नंदकिशोर काबरा, यू. डी.  चव्हाण, वल्लभ बाहेती, डी. एम. मंत्री, राजाराम जाजू, पठाण खान, व्यंकटेश काबरा आदी सदस्य नियमितपणे सकाळी स्मशानभूमीत येऊन व्यायाम करतात. स्मशानभूमीत व्यायाम या अनोख्या उपक्रमाची सेलू शहरासह तालुक्यात सर्वदूर कुतूहलाने चर्चा होत आहे.

जिवंतपणीच आकर्षण...

गावात, अथवा शहरात केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्मशानभूमी असावी, असे म्हणतात. कारण प्रत्येक जिवंत माणसाला एक दिवस येथे यायचे आहे, याचे भान राहिले पाहिजे. याच कल्पनेतून स्मशानभूमीत दर्शनी भागात असावी, असा एक सूर उमटत आहे. मात्र, या कल्पनेच्या उदात्त हेतूने सेलू शहराचे कल्पक नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सेलू शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तहसील कार्यालय परिसरात असलेल्या स्मशानभूमीला सुशोभित केले आहे.

सुशोभित केल्यानंतर शांतिधाम स्मशानभूमी आहे की, शांतिधाम गार्डन? हाच प्रश्न प्रत्येकाला पडत आहे. त्यामुळे सेलू शहरातील स्मशानभूमी ही जिवंत माणसासाठी आकर्षण ठरली असून चक्क व्यायामासाठी म्हणून स्मशानभूमीचाच वापर होताना दिसत आहे. सेलूकरांसाठी ही कुतूहलाची बाब ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com