भाग एक : शेतकऱ्यांनी ‘अशी’ करावी शेतीची कामे 

File photo
File photo

नांदेड : ‘कोविड-१९’च्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे शेतीत कामे करण्यासाठी मजुर मिळणे दुरापास्त झाल्याने शेतीची कामे रेंगाळली आहे. शेतीची कामे वेळेवर पूर्ण व्हावीत यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत कृषी आणि संबंधित क्षेत्राशी संबंधित उपक्रम सुरु ठेवण्यासाठी, सुलभतेसाठी भारत सरकारने काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतीविषयक व शेतीसंलग्न कामे करावीत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले आहे.

‘कोविड-१९’च्या पार्श्‍वभूमीवर सद्यपरिस्थितीमध्ये रब्बी पिके पक्वता कालावधीमध्ये आहेत. सर्व शेतीची कामे वेळेवर झाली आहेत. त्यामुळे काढणी व हाताळणी तसेच बाजारपेठेत माल पाठवणे अपरिहार्य आहे. तथापी, सदरील रोगाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी आणि सुरक्षा उपायांचे पालन केले पाहिजे. साध्या उपायांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे, साबणाने हात धुवून वैयक्तिक स्वच्छता राखणे, मास्क परिधान करणे, संरक्षक कपडे आणि उपकरणे व यंत्रसामग्री साफ करणे समाविष्ट'आहे. शेतीच्या संपूर्ण कामात प्रत्येक ठिकाणी सुरक्षा उपाय आणि सामाजिक अंतराचे अनुकरण करावे.

विविध राज्यांमध्ये गहू कापणीचे काम चालु आहे. त्यामुळे हार्वेस्टरला जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. दुरुस्ती, देखभाल आणि कापणीच्या कामात गुंतलेल्या कामगारांची खबरदारी व सुरक्षितता सुनिश्‍चित करणे आवश्‍यक आहे. रब्बी हंगामाती मोहरी हे दुसरे महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची काढणी अंतिम टप्प्यात असून जिथे जिथे आधीच कापणी झाली आहे, तेथे मळणी केली जात आहे. मसूर, मका आणि मिरचीची काढणीही सुरु असून हरभरा पिकाची काढणी जवळ येत आहे. शेतातील कामापूर्वी आणि काम झाल्यानंतर पिके, फळे, भाज्या तसेच अंडी आणि मासे या कामात गुंतलेल्यांनी वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक अंतर ठेवण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांनी आराम करण्याच्या वेळी, जेवण करताना तसेच मालाची ने-आण करताना शेतमाल गाडीत भरताना व उतरवताना किमान एकमेकांपासून तीन ते चार फुटाचे अंतर राखले पाहिजे. शक्यतो एकाच ठिकाणी गर्दी न करता शेतीमधील वेगवेगळी कामे कमीत कमी मजुरांमार्फत करणे आवश्‍यक आहे. शेतीकामे शक्यतो मशिनच्या साह्याने करावीत, त्यामध्ये कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा तसेच शेती कामासाठी वापरली जाणारी अवजारे, गोणी तसेच पॅकिंगच्या गोष्टी या सुद्धा निर्जंतुकीकरण कराव्यात. शेतमालाचे ढीग करण्यासाठी दोन ढिगामधील अंतर तीन ते चार फूट ठेवायला पाहिजे. त्यासाठी एक किंवा दोन कामगार वापरावेत. मका आणि भूईमुग या पिकांच्या मळणीसाठी वापरले जाणाऱ्या यंत्रांचे निर्जंतुकीकरण करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com