भाग दोन : ‘अशी’ घ्यावी शेतमालाची व वैयक्तिक काळाजी

File photo
File photo

नांदेड : कोविड-१९च्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांची अमलबजावणी करत शेतकऱ्यांनी शेतीकामे करून स्वतःचीही काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले आहे.

शेतमालाच्या साठवणुकीची अशी घ्यावी काळजी
शेतकऱ्यांनी मालाची वाळवणी, मळणी, धान्य साफ करणे, प्रतवारी करणे इत्यादी कामे ही शेतावरच करणे आवश्‍यक असते. यासाठी शेतकऱ्यांनी तोंडावर मास्क वापरावा जेणेकरून धूळ तोंडावाटे शरीरात जाणार नाही. अन्नधान्ये, कडधान्ये हे काढणीनंतर योग्य वेळेस सुकवावे. साठवणूक करताना किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अगोदर वापरलेल्या गोण्या वापरू नयेत. यासाठी साठवणूकीच्या गोण्यांचे पाच टक्के निंबोळी अर्कात भिजू घालून निर्जंतुकीकरण करावे. शेतमालाची चांगली किंमत येण्यासाठी आवश्‍यकतेप्रमाणे यांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी शेतमाल गाडीमध्ये भरताना तसेच उतरवतांना, बाजारपेठेमध्ये नेतांना व लिलाव करते वेळेस पुरेसे वैयक्तिक सुरक्षिततेचे उपाय करणे आवश्‍यक आहे.

वैयक्तिक सुरक्षितता महत्त्वाची
बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना तयार झालेले बियाणे कंपनीकडे पाठवण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी विकलेल्या बियाण्याचे पैसे घेतेवेळी आवश्‍यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच बियाणे वाहतूक करताना आवश्‍यक कागदपत्रे बरोबर बाळगावी. येत्या खरीप हंगामाच्या दृष्टीकोनातून बियाणे उत्पादक कंपन्या पॅकेजिंग विभाग याना सदरील बियाणे हे एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. जेणेकरून येणारा खरीप हंगाम हा सुरळीत होईल. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, काकडी, पालेभाज्याव इतर भाजीपाला बाजारपेठेमध्ये पाठवताना शेतकऱ्यांनी वैयक्तिक सुरक्षितता पाळणे अत्यंत आवश्‍यक आहे.

शेतात उभ्या असलेल्या
पिकांबाबतच्या उपाययोजना

गहू पिकविणाऱ्या  बहुतांश भागातील तापमान अद्यापही सरासरीपेक्षा कमी असून, गहू कापणीस दहा ते पंधरा दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी कोणतेही नुकसान न होता २० एप्रिल २०२० पर्यंत गव्हाची काढणी करू शकतात. तसेच काढणीस उशीर जरी झाला तरी शेतकऱ्यांना विक्री संदर्भात आवश्‍यक ती उपाययोजना करणे शक्य आहे. फळपिकांमध्ये विशेषतः आंब्यामध्ये फळधारणा होत असून यासाठी आवश्‍यक त्या फवारण्या व पीक संरक्षणाच्या संदर्भात शेतीची कामे करत असताना उपकरणे हाताळताना सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे.

संरक्षित उपाययोजना कराव्यात
उन्हाळी कडधान्य पिकांमध्ये पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी वैयक्तिक पातळीवर संरक्षित उपाय योजना कराव्यात. जेणेकरून विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.
- डॉ. देविकांत देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com