मिरचीवर कोकडा, मक्यावर अळी

पिंपळगांव रेणूकाई : मिरचीवर औषध फवारणी करतांना.  
पिंपळगांव रेणूकाई : मिरचीवर औषध फवारणी करतांना.  

पिंपळगांव रेणूकाई  (जि.जालना) - शेतकरी आणि संकट हे नाते एवढे घट्ट झाले की याची फारकत होता होत नाही हे नित्याचे झाले आहे. याची प्रचिती याहीवर्षी दिसून आली ती अशी पिकांवरील रोग, मालाला अल्प भाव, कधी अतिवृष्टी तर कधी पावसाची दांडी. पावसाने हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्षाव केला पण त्यातही धरसोड केली.

सुरवातीला दमदार बरसलेला व पेरणी संपल्यानंतर रूसलेला असे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. कुठे पावसा आता तरी थांब तर कुठे पड पड रे पावसा अशी परिस्थिती झाली आहे. 

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील वरूड बुद्रूक, रेलगाव, कोसगाव, माळेगाव, देहेड, मुर्तड पळसखेडा आदी भागामध्ये दररोज पावसाचा कहर पहायला मिळत आहे मात्र अवघ्या तीन किलोमीटर असणाऱ्या भोकरदन तालुक्‍याच्या उत्तर भागात मात्र पावसाची अजूनही वाट पाहिली जात आहे. 

पिंपळगांव रेणूकाई परिसरात मिरचीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा लॉकडाउन काळ असूनही शेतमालाला योग्य भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड केली, मात्र त्यावर कोकडा रोगाने आक्रमण केल्यामुळे मिरचीचे वाटोळे झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरची उपटून त्यावर झालेल्या खर्चावर पाणी फेरत नवीन मिरची लागवड केली आहे. तर अनेकांनी मिरचीवर होणारा खर्च झेपणार नाही म्हणून इतर पिकांची लागवड केली आहे. 

सोयाबीननेही दिला धोका 

आधी लागवड केलेले सोयाबीनचे पीक उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. कुठलीही शासकीय मदत न मिळता शेतकऱ्यांनी कसेबसे दुबार पेरणी करत कोणी परत सोयाबीन तर कोणी सोयाबीन ऐवजी मका लागवड केली कृषी खात्याच्या अंदाजानुसार वाढणारे सोयाबीनच्या क्षेत्राऐवजी मकाचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

मकात लष्करी अळीचा शिरकाव 

मकाचे पीक अजून जोमात येत नाही तोच त्याच्या कोंबात लष्करी अळीने मुक्काम सुरु केला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला. आता मका पिकाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. महागडे औषध फवारणी, कोंबात औषध टाकणे याकडे वळला आहे. काय करावे अन काय नाही या प्रसंगात आर्थिक संकट असतानाही शासकीय मदत कधी मिळेल यापेक्षा आता आपल्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यात प्रयत्न शील आहे. 

यावर्षी योग्य भाव मिळेल या आशेवर दोन एकर मिरची लागवड केली होती. मात्र कोकडा रोगाने मिरचीची पार वाताहत झाली. इतर झाडेही कोकडाच्या कचाट्यात येतील म्हणून एक एकर मिरची उपटून टाकली. 
- शिवाजी वाघ, शेतकरी, वरूड बुद्रूक 

उन्हाळी मिरची लागवड केली होती, मात्र मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. कोकडा रोगाने ग्रस्त झालेली मिरचीची दोनशे झाडे उपटून त्याचा नायनाट केला. यात मोठे नुकसान झाले आहे. 
- रतन मिसाळ, शेतकरी, रेलगाव 

तीन एकर खात्रीतले घरगुती बियाणे आणून सोयाबीन लागवड केली होती मात्र तीही तुरळकपणे उगवली. आता पुन्हा दुबार पेरणी करत सोयाबीन लागवड केली. यावर्षी दुबार पेरणीचे मोठे संकट आले आहे. 
- सागर चांदा, शेतकरी, कल्याणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com