मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला नक्कीच माहित नसणार...

KILLE WADGAW
KILLE WADGAW

हिंगोली : पेठवडगाव (ता. कळमनुरी) येथील शिवकालीन ऐतिहासिक वारसा जपणारा किल्‍ला शालेय विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरत आहे. निजाम व इंग्रजांना जेरीला आणणारे नवसाजी नाईकदेखील काही दिवस किल्‍ल्‍यावर वास्‍तव्याला होते. मात्र, ऐतिहासिक किल्‍ल्‍याकडे पुरातत्‍व विभागाचे दुर्लक्ष होत असून विकास करणे गरजेचे झाले आहे.

पूर्वी किल्‍ले वडगाव व पेठवडगाव ही दोन्ही गावे किल्‍लेवडगाव अंतर्गत होती. त्‍यानंतर गावाचे विभाजन झाले. आता हा किल्‍ला पेठवडगाव गावच्या शिवारात आहे. मात्र, पूर्वी किल्‍ल्‍याच्या नावाने या गावाला किल्‍ले वडगाव असे नाव पडले आहे. या किल्‍ल्‍याला चारही बाजूंनी बुरूज आहेत. शिवाय किल्‍ल्‍यात अनेक भुयारी मार्ग सापडतात. किल्‍ल्यावरील एका दगडावर शिवराज मुद्रा असलेली लिपी पाहावयास मिळते.

नवसाजी नाईक यांचे वास्‍तव्य

माहूरचे संस्‍थानिक राजे उदाराम देशमुख यांच्या अधिपत्‍याखाली हा किल्‍ला असल्याचे ग्रामस्‍थ सांगतात.
या शिवाय अनेक ऐतिहासिक घटनांशी नाते किल्‍ल्‍याचे जुळलेले आहे. किल्‍ल्‍याचा कारभार रायबागन नावाची महिला पूर्वी पाहत असे. तसेच एकाच वेळी निजाम व इंग्रजांना जेरीला आणणारे नवसाजी नाईक हेदेखील काही दिवस या किल्‍ल्‍यावर वास्‍तव्य करून होते.

१८५७ च्या काळात तब्‍बल वीस वर्षे उठाव चालला होता. या उठावाचे सरदार नवसाजी नाईक हे होते. नवसाजी नाईक यांना इंग्रज सरकारने नाव्हा (ता. हदगाव) गावात घेरले असता ते घरातून भुयारी मार्गाने या किल्‍ल्‍यात आल्याचे येथील गावकरी सांगतात.

नवरात्रात विविध धार्मिक कार्यक्रम

अनेक भुयारी मार्ग अजूनही किल्‍ल्‍यात आहेत. या किल्‍ल्‍यावर देवीचे मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. किल्‍ल्‍याचे प्रवेशद्वार दगडी बांधणीचे आहे. मात्र, दिवसेंदिवस किल्‍ल्‍याची पडझड होत आहे. गुप्त धनाच्या आशेने अनेकांनी ठिकठिकाण खड्डे खोदल्याचे दिसून येते. किल्‍ल्‍यातील ऐतिहासिक बारव गाळाने भरलेली आहे. येथे किल्‍ल्‍यावर जाण्यासाठी पायऱ्या व पथदिवे तेवढे बसविण्यात आले आहेत.

सुविधा उपलब्ध करण्याची गरज

आता राज्य शासनाने पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासकामांच्या माध्यमातून येथे विकासकामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, हा किल्‍ला शाळेतील विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरत असून अनेक शाळेतील सहली येथे किल्‍ला पाहण्यासाठी येत आहेत.

शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना किल्‍ल्‍याचा इतिहास सांगून महत्त्व सांगतात. मंदिराच्या परिसरात व किल्‍ल्‍यावर असलेल्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत विसाव्यासाठी पर्यटक थांबतात. मात्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्‍था नाही. त्‍यामुळे याकडे लक्ष देऊन येथे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून किल्‍ल्‍याचे जतन करणे गरजेचे झाले आहे.

किल्ल्याचे जतन करण्याची गरज

पूर्वी किल्‍ले वडगावच्या नावाने ओळखला जाणारा किल्‍ला सध्या पेठवडगावच्या शिवारात आहे. मात्र, दुर्लक्षित झालेल्या किल्‍ल्‍याचे जतन करणे गरजेचे झाले आहे. सोयीसुविधादेखील उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
- सोमनाथ रणखांब, ग्रामस्‍थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com