चारशे गरजूंना मोफत शिवभोजन थाळीचा आधार

Shiv-bhojan thali
Shiv-bhojan thali

सेनगाव(जि. हिंगोली): शहरात लॉकडाउन परिस्थितीमुळे हॉटेल, भोजनालय, अल्पोहारोची प्रतिष्ठाने बंद आहेत. शिवसेनेच्या पुढाकाराने महिन्यापूर्वी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे दररोज जवळपास चारशे गरजूंना घरपोच मोफत भोजन पुरविल्या जात असून शिवभोजन थाळी अनेकांसाठी संजीवनी ठरली आहे.

सेनगाव हे तालुक्याचे ठिकाण असून अनेक मजूर, कामगार, रुग्ण, मोठ्या संख्येने राहतात. त्यांना अल्प दरात दर्जेदार भोजन मिळावे यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी शिवभोजन थाळी सुरु करण्याचा निर्धार केला.

आमदार, खासदारांकडे पाठपुरावा

 त्यांनी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांच्याकडे पाठपुरावा करताच दोन्ही लोकप्रतिनिधींनी तत्काळ शिवभोजन थाळी सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांच्या पुढाकारातून शासनमान्य शिवभोजन थाळीचा शुभारंभ (ता.दोन) एप्रिल रोजी झाला. 

लॉकडाउनमुळे नागरिकांची गैरसोय

कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू झाले. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी संचारबंदी लागू झाल्यानंतर हॉटेल्स, भोजनालय, अल्पोपहाराची प्रतिष्ठाने बंद झाली. दरम्यान, यामुळे शहरातील अनेक गोरगरीब, मजूर, कामगार व गरजूंच्या भोजनाची मोठी गैरसोय होऊ लागली होती. 

चारशे जणांना मोफत भोजन 

मात्र आपत्कालीन परिस्थितीत शहरात शिवभोजन थाळी सुरू झाल्यामुळे अनेक गरजूंना वेळेवर भोजन मिळू लागले आहे. येथील शिवभोजन थाळीमधून दररोज शहरातील कामगार, मजूर, गोरगरीब व रुग्ण अशा चारशे जणांना कोणतेही शुल्क न आकारता मोफत भोजन दिल्या जात आहे. 

भोजन घरपोच वितरित

येथे जवळपास एकूण १३ कामगार आहेत. यात पाच महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. या कामगारांना रोजगारही उपलब्ध झाला असून हे कामगार स्वतः गरजूंना पोळी, भात, वरण पॅकिंग केलेले भोजन घरपोच वितरित करीत आहेत. लॉकडाउन परिस्थितीमुळे काही व्यवसायिकांकडून अत्यावश्यक वस्तू अवाच्या सव्वा किमतीने विक्री करून सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

नि:शुल्क भोजन देण्याचा उपक्रम

मात्र या उलट परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक दायित्वाची भूमिका शिवभोजन थाळी संचालकांकडून घेत नि:शुल्क भोजन देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चारशे गरजूंची भूक भागविल्या जाते 

तालुका ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्याचा संकल्प खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर यांच्याकडे व्यक्त करताच त्यांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत दररोज चारशे गरजूंची भूक भागविल्या जात आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. गरजूंची सेवा करण्याची संधी मिळते. यामध्ये खूप मोठे समाधान वाटते.
- संदेश देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com