पंचनाम्यासाठी दोन किलोमीटर चिखल तुडविणाऱ्या अधिकाऱ्याचे गृहमंत्र्यांनाही कौतुक ! 

panchnama.jpg
panchnama.jpg

गेवराई (बीड) : खाकी वर्दीतील अनेक अधिकारी कर्मचारी ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिदवाक्य घेऊन काम करण्यासाठी धडपडत असतात. अशीच एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रामाणिक धडपडीची दखल खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. या अधिकाऱ्याच्या कर्तव्यदक्षपणाचे आणि कार्यतत्परतेचे त्यांनी कौतुक केले. 

घडला प्रकार असा :
एरंडगाव (ता. गेवराई) येथील सखाराम कवठेकर या ऊसतोड मजूराने ता. २५ सप्टेंबरला आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास गेवराई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप काळे यांच्याकडे आला. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यासह मुकादमांचा आरोपीमध्ये समावेश होता. घटनास्थळाच्या पंचनाम्यासाठी त्यांनी एरंडगाव गाठले. मात्र, आत्महत्या करणारे सखाराम कवठेकर गावापासून दोन किलोमिटर अंतरावरील शेतात राहत होते. शेतात जायला रस्ता तर नाहीच. शिवाय मागच्या आठवड्यात सततच्या जोरदार पावसाने सर्वत्र चिखलही झालेला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी गावातच पंचनामा करावा, आम्ही स्वाक्षऱ्या करु, असा प्रस्ताव समोर ठेवला.

मात्र, या प्रामाणिक आणि कर्तव्य तत्पर संदीप काळे या अधिकाऱ्याने विनम्र नकार देत आपण घटनास्थळीच जाऊ असे सांगीतले. घटनास्थळाकडे निघाले तर सर्वत्र चिखलमय रस्ता, शेतात वाढलेले तुरीचे पिक आणि कपाशी. त्यातून जायचे तर पाय चिखलात फसणार होते. मग, संदीप काळेंनी आपला बुट काढला आणि पँट फोल्ड करुन मार्गक्रमण सुरु केले. दोन किलोमिटर अंतराचा चिखलाचा रस्ता तुडवीत शेतपिकांतून रस्ता काढून त्यांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा केला. जर गावातच पंचनामा केला असता तर त्यात त्रुटी राहून आरोपींना भविष्यात पळवाट शोधण्यास संधी राहू नये म्हणून त्यांनी हा चिखलातून पायपीटीचा मार्ग अवलंबीला.

त्याची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घेतली. श्री. देशमुख यांच्या सोशल मिडीयाच्या पेजवरुन त्यांनी संदीप काळे चिखलातून पायपीट करत असल्याचे फोटो पोस्ट करुन ‘संदीप काळे यांनी दाखविलेली कर्तव्यदक्षता आणि कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहे’ अशी शाबासकीही अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच, आमदार मनिषा कायंदे यांनीही आपल्या ट्विटरवर ‘सत्कार्यासाठी काम करावे, सत्कारासाठी नाही या हेतूने महाराष्ट्र पोलिस जनतेसाठी सदैव तत्पर! गेवराई तालुक्यात पंचनामा करण्यासाठी चिखलात दोन किलोमिटर चालत जाणारे सहाय्यक पोलिसनिरीक्षक संदीप काळे व पोलिस कर्मचाऱ्यांच्या वर्दीला सलाम’ अशी पोस्ट करुन शाबासकी दिली आहे.

शिक्षकी पेशातून पोलिस दलात आलेल्या संदीप काळे यांची पंधरा वर्षांची खाकीतली कारकिर्द अशीच राहीलेली आहे. अत्यंत शांत, संयमी तसेच लोकाभिमुख अधिकारी असलेल्या काळेंचे जसे इतर ठिकाणी चाहते आहेत तसे गेवराई तालुक्यातही वाढले आहेत. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे आणि कार्यतत्परतेचे सोशल मिडीयातून आणि गृहमंत्र्यांसह आमदारांनी कौतुक केले त्यामुळे बीड पोलिस दलाची मानही पुन्हा उंचावली आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत, चिखल काय, नदी आणि दऱ्याखोऱ्या काय, आम्हाला वर्दीचे कर्तव्य बजावण्यासाठी सर्व सारखे असल्याची भावना संदीप काळे यांनी व्यक्त केली. तर, बीड पोलिस दलाच्या टिममध्ये असे कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यतत्पर अधिकारी असल्याचा अभिमान असल्याचे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी म्हणाले.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com