बाहेरगावावरून आलेल्यांनी माहिती न दिल्यास फौजदारी गुन्हा, लातूर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

Latur District Collector G.Shrikant
Latur District Collector G.Shrikant

लातूर : संपूर्ण देशात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत ता.२४ मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी २५ मार्चपासून तात्काळ सुरू होऊन ता.१४ एप्रिलपर्यंत राहणार आहे. टाळेबंदी जाहीरच झाल्यापासून ते आजपर्यंत मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून तसेच परप्रांतातून अथवा परदेशातून आपल्या घरी जे नातेवाईक आले असतील त्यांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. जे लोक अशी माहिती प्रशासनाला देणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिला आहे.


गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या वतीने आशा कार्यकर्त्या व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत शहरात सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात पुणे, मुंबई तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात येत आहे. आतापर्यंत महापालिकेच्यावतीने चार लाख ऐंशी हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात फक्त तीन हजार नागरिकच पर जिल्ह्यातून आले असल्याचे दिसून आले आहे. परंतु क्वॉरंटाईनच्या भीतीमुळे नागरिक माहिती देत नसल्याची बातमी 'सकाळ'ने सोमवारच्या (ता.सहा) अंकात प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अशी माहिती न देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.


जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व आरोग्य सेविका या घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींची माहिती गोळा करत आहेत. त्यामध्ये बाहेरून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींची माहिती स्वतंत्रपणे घेतली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी टाळेबंदी जाहीर झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तींची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. तसेच ते त्यांच्या कुटुंबासाठी व जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात आलेल्या अशा व्यक्तींचे आरोग्य तपासणी आरोग्य विभागामार्फत होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने त्यांच्याकडे आलेल्या नातेवाईकांची (मुले, आई-वडील व भाऊ-बहीण) माहिती प्रशासनाला स्वतः हून कळवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.


लातूर शहरातील लातूर महापालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे; तर नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात नगरपालिकेच्या वतीने कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या वतीने यापद्धतीने माहिती संकलित केली जात असल्याने प्रशासनाच्या या मोहिमेला जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःहून प्रतिसाद दिल्यास प्रशासनाला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत काटेकोरपणे राबवणे सोयीचे होणार आहे, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com