अंबड : शहरात सध्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी विकतच्या जार व टँकरवर भिस्त आहे. शहरात पालिकेच्या वतीने दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे शहरवासीयांची तहान भागणे कठीण झाले आहे. पालिका प्रशासनाचे शहरातील नागरिकांना सुविधा पुरविताना उदासीन धोरण असल्याचे दिसून येते. पालिका कराचा बोजा आकारते, पण सुविधांचे काय? असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शहरात पालिकेच्या वतीने नागरिकांना विविध कर आकारले जातात. पण, कराची वसुली करताना नागरिकांना पाहिजे, त्या सुविधा मिळत नसल्याचे बोलले जाते. शहरातील नागरिकांना पालिकेच्या वतीने वेळेत व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. यामुळे विकतच्या पाण्यावर नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे.
शहरात गल्लोगल्ली पाण्याचे जार विक्री करण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. घरगुती, दुकानदार, व्यावसायिक, छोटे-मोठे उद्योजक यांना दैनंदिन विकतच्या जारवर तहान भागवावी लागत आहे. पाणी विक्रीतून अनेक तरुण युवकाला रोजगार मिळत असल्याचे समाधान आहे. तर, दुसरीकडे पाण्याचे जार, टँकर विक्री करणाऱ्यांची सध्या चांदी आहे.
शहरालगत असलेल्या अंबड-पाचोड मार्गावरील म्हाडा कॉलनी परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांना अद्यापपर्यंत पाण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध झाली नाही. यामुळे प्रत्येकाची विकतच्या टँकरवर पूर्णपणे भिस्त आहे.
शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये शेती अवजारे बनविण्याचा पहिला कारखाना आहे. मात्र, पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने दैनंदिन पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहे.
-ज्ञानेश्वर जाधव, नवनाथ इंजिनिअरिंग वर्क्स, अंबड
शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये कारखानदारी उभारणीसह उद्योगधंदे यास मोठ्या प्रमाणात गती येत आहे. पण, सर्वात महत्त्वाची पाण्याची समस्या उद्योजकांना भेडसावत आहे. यामुळे उद्योगांना खीळ बसत आहे.
-विठ्ठलसिंग राजपूत, नागरिक