शेतकऱ्यांना दिलासा : महाराष्ट्र ग्रामीण-डीसीसीसीची पीककर्ज वाटपात आघाडी 

crop loan.jpg
crop loan.jpg

बीड : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बँकांमागे दट्टा लावल्याने आतापर्यंत उद्दिष्टाच्या ९६ टक्क्यांहून अधिक पीककर्ज वाटप झाले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टाहून अधिक पीककर्ज वाटप केल्याचे आकडेवारीतून दिसते.

बँक ऑफ महाराष्ट्रनेही पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती केली आहे; मात्र एकीकडे असे समाधानकारक चित्र असले तरी दुसरीकडे स्टेट बॅंक ऑफ इंडियासह १३ बँका उद्दिष्टापासून चार हात दूरच आहे. विशेष म्हणजे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून तिजोऱ्या भरलेल्या काही बँकांचे वाटप तर निम्मेही झालेले नाही. आता त्यांच्याबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. 

यंदा १६ बँकांना ९५० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. कर्जवाटप सुरू होण्याच्या सुरवातीलाच कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाले; मात्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यात लक्ष देऊन बँकांना शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कर्जवाटपाच्या सूचना दिल्या. त्यासाठीची नियमावली आणि वेळापत्रकही ठरवून दिले. विशेष म्हणजे कर्जमागणी अर्जांचा स्वीकार करण्यासाठी राज्यात कुठे नव्हे असे खुद्द तलाठ्यांना गावात पाठविण्यात आले. याचा परिपाक म्हणून आतापर्यंत एक लाख ४५ हजार ४१६ शेतकऱ्यांना ९१७ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे.

उद्दिष्टाच्या हा आकडा साधारण ९७ टक्क्यांपर्यंत आहे. विशेष मागच्या काही वर्षांत प्रथमच यंदा मोठ्या प्रमाणावर पीककर्जवाटप झाले आहे. दरम्यान, पीककर्ज वाटपात ग्रामीण भागात शाखांचे जाळे असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २९० कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना या बँकेने आतापर्यंत ५४ हजार शेतकऱ्यांना ३२३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केल्याची माहिती विभागीय प्रबंधक श्री. कुलकर्णी यांनी दिली. या बँकेने उद्दिष्टांपेक्षा ११ टक्के अधिक वाटप केले, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही ३९ हजार शेतकऱ्यांना १५५ कोटी ५० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली. बँकेला १०० कोटींचे उद्दिष्ट असताना बँकेने ५५ कोटींहून अधिक पीककर्ज वाटप केल्याचे ते म्हणाले. बँक ऑफ महाराष्ट्रनेही ५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना ५५ कोटी रुपयांपर्यंत वाटप केले आहे. 

एसबीआयसह १३ बँका मागेच 
पीककर्जमाफीत सर्वाधिक ५७३ कोटी रुपये तिजोरीत पाडून घेतलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला अद्याप उद्दिष्टपूर्ती साधता आलेली नाही. या बँकेने उद्दिष्टाच्या ९५ टक्के वाटप केले आहे. यासह १३ बँका उद्दिष्टपूर्तीपासून चार हात दूरच आहेत. 

हात आखडलेल्या बँकांवर काय कारवाई होणार 
बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, डीसीबी बँक, आयडीबीआय बँकांचे पीक कर्जवाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. तर, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक या बँकांचे वाटप अगदीच कमी आहे. शेतकरी पीककर्जासाठी खेटे मारून परेशान असताना आणि प्रशासन वारंवार सूचना देत असतानाही या बँका मोजायला तयार नाहीत. आता प्रशासन या बँकांवर काय कारवाई करणार हे पाहावे लागेल. 

एकदाही कर्ज न घेतलेले व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे पीककर्ज मागणीचे अर्ज बँकांनी ३० सप्टेंबरपर्यंत जमा करून घ्यावेत. अशा सर्वांचे अर्ज बँकांनी स्वीकारून कर्जवाटप करावे. ज्या बँका अर्ज स्वीकारणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. 
- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com