‘महायुती' पेक्षा ‘महाविकास’ कडून शेतकऱ्यांना ५५५ कोटी अधिक

पीककर्ज.jpg
पीककर्ज.jpg

बीड : सरकारी निर्णयांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर मोजमाप करुन कार्यकर्ते आमचेच सरकार चांगले म्हणत असतात. पण, तत्कालिन महायुती आणि आताच्या महाविकास आघाडी या दोन्ही सरकारने जाहिर केलेल्या महत्वकांक्षी कर्जमाफी योजनेतील आकड्यांचा विचार केला तर महाविकास आघाडीची पीककर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशिर दिसत आहे. 

मागच्या महायुती सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख ८२ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. या शेतकऱ्यांच्या खात्यात ८५३ कोटी ७२ लाख रुपये जमा झाले होते. आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून आतापर्यंत मागच्या पीक कर्जमाफीच्या तब्बल ५५५ कोटी रुपये अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आतापर्यंत दोन लाख २९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १४०८ कोटी २९ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. तीन लाख तीन हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्यामुळे आणखी ७४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यातून पाचशे कोटींवर रक्कम आणखी येऊ शकते. पीक कर्जमाफीच्या योजनेच्या संपूर्ण अंमलबजावणीनंतर मागच्या कर्जमाफीच्या रकमेत दुपटीहून अधिक फरक असू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत तरी महाविकास आघाडीच सरस म्हणावी लागणार आहे.

मागच्या महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली. मात्र, दिड लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीक कर्जमाफी मिळविण्यासाठी त्यापुढील रक्कम भरण्याचे बंधन शेतकऱ्यांवर घालण्यात आले. त्यामुळे या योजनेचा पुरेसा लाभ शेतकऱ्यांना घेता आला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना खिशातून पैसे भरणे शक्य होते अशाच शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतल्याने त्यावेळी केवळ एक लाख ८२ हजार ३७५ शेतकरी या योजनेत पात्र ठरले. त्यांना ८५३ कोटी रुपये ७२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली.

आताच्या सरकारने २०१५ नंतर कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत दोन लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यात तीन लाख तीन हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले. आतापर्यंत दोन लाख ६७ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून यातील दोन लाख ५६ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. त्यापैकी दोन लाख २९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १४०८ कोटी २९ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. 

आकडे बोलतात..

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

  • - एक लाख ८२ हजार ३८५ शेतकरी पात्र.
  • - ८५३ कोटी ७२ लाख रुपयांची कर्जमाफी.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

  • - तीन लाख तीन हजार शेतकरी पात्र.
  • - दोन लाख ६७ हजार ४०३ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध.
  • - दोन लाख ५६ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकर.
  • - दोन लाख २९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १४०८ कोटी रुपये जमा.

आतापर्यंत बँकनिहाय मिळालेली रक्कम

  • - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : ३४४ कोटी रुपये.
  • - स्टेट बँक ऑफ इंडिया : ५७३ कोटी ६७ लाख रुपये.
  • - महाराष्ट्र ग्रामीण बँक : ३३३ कोटी ५० लाख रुपये.
  • - बँक ऑफ महाराष्ट्र : ५४ कोटी ९८ लाख रुपये.
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com