Marathwada Muktidin : मराठवाडा मुक्तिसंग्रामात अग्रेसर राहिलेला जालना

स्वातंत्र्यसैनिकांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोचणे गरजेचे
marathwada
marathwadasakal

जालना - मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये जिल्ह्यातील विविध स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला. अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतर मराठवाडा निजाम राजवटीतून मुक्त झाला. या आंदोलनात त्या काळी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असलेल्या जालन्याचे हजारो तरुण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते. स्वातंत्र्यसैनिकांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोचणे गरजेचे आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात रझाकारांशी अनेकांनी दोन हात केले. यात बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील स्वातंत्र्यसैनिक दगडाबाई देवराव शेळके. ग्रामीण भागात रात्री- अपरात्री स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी मदत केली. मराठवाड्याबाहेर बुलडाणा, मनमाड, कान्हेगाव, टाकळी या कॅम्पवरून त्यांनी निजामाची सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केला. भोकरदन तालुक्यातील टाकळी कोलते या कॅम्पवर त्यांनी खूप शौर्य दाखविले. यासह स्वातंत्र्यसैनिक बाबूराव जाधव, लाला लक्ष्मीनारायण, डॉ. धामणगावकर यांच्यासमवेत जिवाची पर्वा न करता लढा दिला.

रेल्वे रूळ उखडणे, पोलिस चौक्या जाळणे इत्यादी कामे करून त्यांनी रझाकारांना हैराण केले. त्यांनी रझाकार कॅम्पवर हातबॉम्बसह खांद्यावर रायफल व अंगात लष्करी गणवेश घालून त्या शत्रूच्या गोटात शिरून गोळीबार ही केला. स्वातंत्र्यसैनिकांचा मागोवा घेताना मनोहरराव सोनदे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. स्वामी रामानंद तीर्थ, बाळासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ आदी मान्यवरांच्या विचाराने ते प्रभावित होते.

सोनदे यांची कार्यपद्धती अन् वाणीच तेज लक्षात घेऊन स्वामीजींनी त्यांची जालना, अंबडसाठी पूर्णवेळ संघटक म्हणून नियुक्ती केली. जालन्याला राहून त्यांनी गुमास्ते, हमाल व विद्यार्थी संघटित केले. तरुणांना शस्त्र आणि युद्धतंत्राचे लाठी-काठीचे शिक्षण देऊन मनामनांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. मनोहर सोनदे यांना हनुमंत बेंडे, गुंजकर, भा.सी. व्याहाळकर सहकार्य करीत. तर जालना शहरातील काम राधाकिशन लाला. बद्रीनारायण बारवाले, गोपीकिशन निमोदिया उत्तमचंद जैन, विष्णू सावजी, दुरण्णा रामण्णा हे पाहत. विद्यार्थ्यांची संघटना यांनी प्रथम बांधली. जनार्दन मामा, बद्रीनारायण बारवाले व अनंतराव जड हे तिघे काम बघत. तर सवितादेवी आर्य यांनी महिला संघटना बांधली. जनार्दन मामा नागापूरकर यांचा मुक्तिसंग्रामातील तेजस्वी लढा स्मरणात राहणार आहे.

marathwada
Satara News : पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर कराडला मुस्लिम समाजाची पोलिसांसमवेत बैठक; संशयीतावर कारवाईची मागणी

मुक्तिसंग्राम लढ्यात हजारो तरुणांनी एकत्र येऊन निजामाच्या विरोधात आंदोलन सुरू केले. मराठवाड्याच्या सीमेवर स्वातंत्र्यसैनिकांचे कॅम्प होते. मनोहर सोनदे यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगावराजा इथे कॅम्प होता. तेथील स्वातंत्र्यसैनिकांनी ता.१५ ऑगस्ट १९४८ रोजी डोणगाव (ता. जाफराबाद) येथील रझाकारांच्या कॅम्पवर हल्ला केला. दुर्दैवाने एक गोळी जनार्दन मामांना लागली आणि ते बेशुद्ध पडले. लगेच त्यांना बुलडाणा येथील रूग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रिया करून गोळी काढली; पण ता.१७ ऑगस्ट १९४८ रोजी त्यांनी तिथेच हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ जालन्यात मामा चौक म्हणून प्रसिद्ध असलेल्या चौकात त्यांचा पुतळा उभारला आहे.

याशिवाय अॅड. स. कृ. निरखी, भाऊसाहेब देशपांडे, चंदू खोले, राधाकिशन लाला, विश्वनाथराव खेरुडकर, मनोहरराव जळगावकर, अॅड. द.ग. देशपांडे जाफराबादकर, आबासाहेब देशपांडे, अॅड. मोहनलाल गोलेच्छा, भाऊसाहेब मिटकर, अॅड. विश्वनाथराव कुलकर्णी, वसंत राक्षसभुवनकर, अॅड. सखारामपंत खापरखुंटीकर, भगवंतराव गाढे, भाऊसाहेब देशमुख, मदनलालजी चौविश्या, राधाकिशन मास्तर, हुतात्मा रयाजी म्हतारबा, दाजिबा म्हस्के, केशवराव कोलते, रामराव कुलकर्णी, सीताराम माळी, जयसिंग तुळशीराम या व अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात मोलाचे कार्य केले.

marathwada
Marathwada : मुक्तीसाठी विश्वनाथ राजहंस यांनी पत्करले हौतात्म्य

टेंभुर्णी येथे विजयेंद्र काबरा, कोलते टाकळी येथील संपत नाईक, पं. माधवराव धुनसीकर यांनीही लढा दिला. शिवाय १९३८ साली झालेल्या सत्याग्रहात घनश्यामदेव शर्मा, मांगीलाल दायमा, लक्ष्मीनारायण लाला, नंदलाल आर्य, शिवराम पिराजी, गणपत सोनार, सत्यनारायण शिंपी यांनी भाग घेतला व तुरुंगवासही भोगला. स्टेट काँग्रेसने पुकारलेल्या सत्याग्रहात लक्ष्मणराव देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाग घेतला. तर सत्याग्रहींना हार घातला म्हणून हरी सावजी, जगन्नाथ मित्तल यांना शिक्षा झाली.

तर अंबडला रामचंद्र अष्टपुत्रे, राघवेंद्र देशपांडे, पं. गो. तत्सत, देविदास देशपांडे, दिगंबर अरळकर यांनी सत्याग्रह करून तुरुंगवास भोगला. तर वि.रा. जोशी, निरखी, खंडेराव खलसे, गोपाळराव सामनगावकर, बाबू शिंगणे, नरहर खरडकर, वसंत कल्याणकर, धरणीधर देशपांडे, विश्वनाथराव खेरुडकर यांनी सत्याग्रह करून शिक्षा भोगली. अनेकांनी खादीचा स्वीकार केला. डॉ. मुरलीधरराव काळे, गंगाबिशन करवा, मोहनलाल करवा, रामजीवन करवा, विष्णुदास शर्मा, गणेशलाल भक्कड, कटारिया यांचंही या स्वातंत्र्यलढ्यात योगदान महत्त्वाचे आहे.

marathwada
Marathwada Muktidin : शिक्षणात मराठवाड्याचे पाऊल पडते पुढे

पारधच्या वीर वामनराव लोखंडे यांचा सशस्त्र लढा अनेकांना प्रेरणा देणारा ठरला. मराठवाडा मुक्तिलढ्यात भोकरदन, जाफराबाद, अंबड व घनसावंगी तालुक्याचा मोलाचा वाटा आहे. अनेक ठिकाणाहून हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता या मुक्तिलढ्यात सहभाग घेतला होता. मुक्तिसंग्रामाचा लढा नव्या पिढीपर्यंत जाण्यासाठी जालन्यात संदर्भ ग्रंथ वाचनालय, स्वातंत्र्यसैनिकांची माहिती देणारे स्मारक, दालन उभारणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com