परतूर : अनेकांनी कर्ज काढून शेतीला लावले, मात्र पिके वाया गेली. आता कर्ज कसे फेडायचे ही चिंता सतावत आहे.यंदा पिकांचे नुकसान लय झालंय. खरीप गेलंय, जमीन वाहून गेली, खरवडली. आता रब्बीचीही आशा नाही, याचा शासनाने विचार करावा, मायबाप सरकारने तात्काळ मदत द्यावी, अशी भावना हातडी येथील शेतकरी विलास बोरकर यांनी व्यक्त केली.
हातडी परिसरात शेतीचे मोठे नुकसान झाले. आता दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पाण्यातील सोयाबीन काढणीची लगबग दिसून येत होती. मजूरही मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबासह, युवकांसह शेतात सोयाबीनची काढणी करत आहे. कापसाची बोंड सडली आहेत. अनेकांच्या सोयाबीनला कोंबही फुटले. पावसाच्या भीतीमुळे थोडेबहुत निघालेल्या सोयाबीनची मळणी यंत्राद्वारे मळणी केली जात आहे. खरिपाची सर्वच पिके काही दिवसांपूर्वी जोमात होती. उत्पादन भरपूर होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. अतिवृष्टीसह पावसामुळे हातात आलेली पिके गेली. जी आहेत त्यात अधून मधून पडत असलेल्या पावसामुळे उत्पादन मिळणार नाही. शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई तात्काळ मिळावी, असे शेतकरी सुधाकर झरेकर, विलास बोरकर, भागवत शिंदे, विकास झरेकर आदींनी नमूद केले.
शेतकऱ्यांवर यंदा अत्यंत वाईट परिस्थिती आलेली आहे. शेतकऱ्यांचे गणित नियोजन बिघडले आहे. पाऊस नव्हता तेव्हा सोयबीन पीक जोमात होते, काढणीच्या वेळीच पिके पाण्यात गेली. मजूर काढण्यास येत नाहीत, पिके पाण्यात आहेत.
-सुधाकर झरेकर, हातडी, शेतकरी
निसर्गाच्या लहरीपणाचा सतत फटका बसत आहे. हाती आलेले पीक जाते, कधी पीक चांगले येते तर बाजारात भाव मिळत नाही. नुकसान ठरलेले आहे. खूप मेहनत घेऊन शेती पिकविली, पण अतिवृष्टीसह पावसाने पिकांचे नुकसान झाले.
- भागवत शिंदे, हातडी, शेतकरी,
शब्दांकन - राहुल मुजमुले
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.