सर्वांना अन्नधान्य मिळण्यासाठी नांदेडला उपाययोजना

file photo
file photo

नांदेड - शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या माध्यमातून गरजू लोकांना जेवण व अन्नधान्य देण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर कामांमध्ये एकाच विभागात दोन स्वयंसेवी संस्थेमार्फत दोन वेळा अन्नधान्य वाटप होण्याची शक्यता आहे. त्यात सुसुत्रता यावी, यासाठी   प्रत्येक विभागात क्षेत्रनिहाय समन्वय अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली. 

नांदेड शहर आणि जिल्ह्यात गरजू, गोरगरिबांसह सर्वांना अन्न मिळावे, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. अन्नधान्य वाटपात सुसूत्रता आणण्यासाठी आता समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

स्वयंसेवी संस्थेची यादी तयार
तालुकास्तरावर नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी व ग्रामीण भागात ग्रामसेवक तसेच महापालिका क्षेत्रात महापालिकेचे आयुक्त यांचे अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी यांना समन्वय अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.  तालुक्यातील सक्षम स्वयंसेवी संस्थेची यादी तयार करून समन्वय साधण्यासाठी एका स्वंयसेवी संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. ही संस्था तालुक्यातील नोडल अधिकारी व अन्य स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचे काम करेल.    

एकासारखे गणवेश घालावेत    
गरजू लोकांचे विभाग निश्चित करून भौगोलिकदृष्ट्या सदर धान्याची पाकिटे  विभागणी करून घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तपासणी करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी त्या - त्या विभागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी एकासारखे गणवेश घालावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. हे धान्य वाटप करताना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून धान्य वितरण करणाऱ्या व्यक्ती व लाभार्थी यांना मास्क असणे आवश्यक करण्यात आले आहे. धान्य वितरण करताना देणगीदार तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण करावे. वाटपाचे चित्रीकरण करावे. धान्य वितरणासाठी वितरण केंद्र निश्चित करताना किमान ५० लोकांसाठी १-१ मीटर अंतरावर चौकोन आखून धान्य शिस्तीत वाटावे असे स्पष्ट निर्देश डॉ विपीन यांनी दिले आहेत. 

मोजकेच प्रतिनिधी असावेत
या व्यतिरिक्त धान्य वाटप करताना स्वयंसेवी संस्थांचे मोजकेच प्रतिनिधी हजर राहतील याची दक्षता घ्यावी. धान्य वितरणासाठी पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी. गरजू लाभार्थ्यांना धान्य किट दिल्याबाबत पोहोच घ्यावी. वितरण केंद्रावर आवश्यक बॅरेकेटींग करून घ्यावे. धान्य वितरण करताना शक्यतो घरोघरी जाऊन धान्य वितरण करावे. धान्य वितरण करताना अनावश्यक गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. धान्य वाटप करत असताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील तरतुदीचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही  जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी महापालिका आयुक्त, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले आहेत.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com