नांदेडकरांचा पाण्याचा प्रश्‍न मिटला...कसा ते वाचा...

दिग्रसच्या बंधाऱ्यातून सोमवारी २५ दलघमी पाणी सोडण्यात आले.
दिग्रसच्या बंधाऱ्यातून सोमवारी २५ दलघमी पाणी सोडण्यात आले.

नांदेड - गोदावरी नदीवर विष्णुपुरीतील डॉ. शंकर चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात दिग्रसच्या बंधाऱ्यातून सोमवारी (ता. २७) २५ दलघमी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्यामुळे उन्हाळ्यात नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तूर्तास तरी मिटला आहे. 

नांदेड शहराला विष्णुपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. सध्या विष्णुपुरीत १८.४० दशलक्षघनमीटर एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे दिग्रस बंधाऱ्यात आरक्षित असलेला पाणीसाठा घेण्यासाठी जलसंपदा विभागासह जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबत चर्चा करुन निर्णय घेतला आणि त्यानुसार अंमलबजावणी सोमवारी झाली. 

पालकमंत्री चव्हाण यांनी घेतली बैठक
नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत मंजूर जलनियोजनानुसार विष्णुपुरी प्रकल्पासाठी दिग्रस बंधाऱ्यातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या ६२.६४ टक्के प्रमाणात पाणीसाठा मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार जलसंपदा विभाग तसेच परभणी आणि नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी दिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्याच्या दृष्टीने उपाययोजना केली.

पोलिस बंदोबस्तात सोडले पाणी
दिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्यासाठी मागील अनुभव लक्षात घेऊन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नांदेडचे पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांना पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचबरोबर परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणीचे पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना आवश्‍यक पोलिस बंदोबस्ताचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. सब्बीनवार यांच्या विनंतीवरुन कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे आणि शाखा अभियंता श्री. पोफळे यांना शस्त्रधारी अंगरक्षक आणि जिल्हा प्रवेशाचे पास उपलब्ध करुन दिले. 

सहा दरवाज्यातून सोडले पाणी
जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गव्हाणे, शाखा अभियंता श्री. पोफळे, अनिरुद्ध कुलकर्णी, आर. पी. कातकडे, विजतंत्री गुडेवार, कालवा निरीक्षक श्री. वावरे, विलास देशमुख, अंगरक्षक श्री हंगरजे, श्री. घेवारे आदी तीन जीपद्वारे परभणी आणि पालम पोलिसांच्या संरक्षणात सोमवारी पहाटे पाच वाजता दिग्रस बंधाऱ्यावर पोहचले. त्या ठिकाणी सहा दरवाज्यातून २५ दलघमी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पूर्णाचे श्री. करडिले, पालमच्या तहसीलदार ज्योती चव्हाण, पालमचे पोलिस निरीक्षक सुनिल माने, पूर्णाचे फौजदार श्री. गुट्टे, चुडावाचे फौजदार श्री. चव्हाण, मंडळ अधिकारी श्री. मुरकुटे, तलाठी अंकुश राठोड आदी उपस्थित होते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com