साडेसहा कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा

File photo
File photo

उस्मानाबाद : साडेसहा कोटी रुपयांच्या पुस्तक घोटाळा प्रकरणातील सर्वच बाबी गंभीर आहेत. अभियानाच्या सदस्य सचीव असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या उपक्रमाची काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. 

याबाबत आमदार ठाकूर यांनी गुरुवारी (ता. २७) दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आला होता. २०१७-१८ या वर्षात सुमारे ७ कोटी ५० लाख रुपये जिल्हा स्तरावर आले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, शेतकरी आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी हे अभियान राबविणे अपेक्षित होते.

२६ जानेवारी २०१९ रोजी शेतकऱ्यांना कृषी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे निश्‍चित केले. नॅकाफ (पुणे) या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि पुस्तक वाटप करण्याचे नियोजित होते. त्यासाठी प्रकल्प संचालक आत्मा या शासकीय यंत्रणेकडे सात कोटी १९ लाख रुपयांचा निधी वर्ग केला. मात्र हा कार्यक्रम राबविण्यासाठी आम्ही सक्षम नसल्याचे आत्मा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर तत्कालिन पालकमंत्र्यांनी प्रशिक्षणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडे तर पुस्तक वाटपाचा कार्यक्रम सर्वसाधारण तहसीलदार (जिल्हाधिकारी कार्यालय) यांनी दिला. त्यानुसार प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाल्याचे दिसून येत आहे. मात्र पुस्तक वाटप झाल्याचे कुठेही दिसत नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार धक्कादायक आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी हे योजनेचे सचीव असतानाही त्यांच्याकडे या उपक्रमाची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com