राज्याभरातील शाळांमधून 'एक गाव एक बालरक्षक' चळवळ!

shala 1.jpg
shala 1.jpg

जालना : शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार तीस दिवसापेक्षा जास्त दिवस विद्यार्थी शाळेत उपस्थित नसेल तर तो 'शाळाबाह्य' ठरतो. परंतु चार महिन्यापासून शाळांच्या वर्ग खोल्या विद्यार्थीविना बंद आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीने अनेक कुटुंबे स्थलांतरीत झालेली आहेत. यामुळेच विद्यार्थी 'शाळाबाह्य' होण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी आता 'एक गाव एक बालरक्षक' चळवळ राबविण्यात येणार आहे, हे विशेष. 

कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीने मागील मार्च महिन्यापासून शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे. यातील प्राथमिक शिक्षणातील विशेष बाब अशी की, शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार कायद्यानुसार 'शाळाबाह्य' विद्यार्थी कुणाला म्हणायचे याची व्याख्या करण्यात आली आहे. यानुसार 'एखादा विद्यार्थी तीस दिवसापेक्षा अधिक दिवस वर्गात प्रत्यक्ष उपस्थित नसेल तर तो शाळाबाह्य ठरतो. शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी ९ जानेवारी २०१७ मध्ये तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी राज्यात 'बालरक्षक ' कृती कार्यक्रम सुरु केला होता. जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ' बालरक्षक ' कृती कार्यक्रम राज्यात राबविला गेला. पहिले बालरक्षक म्हणून जालना जिल्ह्य़ातील श्रीरामतांडा येथील मुख्याध्यापक जगदीश कुडे यांची निवड करण्यात आलेली होती. 

दरम्यान तीन वर्षांत राज्यात बालरक्षक कृती कार्यक्रमात ५० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शाळेच्या प्रवाहात आणण्यात शिक्षण विभागाला यश मिळाले होते.कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीने एका अर्थाने आरटीई कायद्यावर आव्हान उभे केले असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. आरटीई कायद्यानुसार विचार केल्यास जून महिन्यापासून राज्यातील लाखो विद्यार्थी ' ऑनलाइन शाळेत असून..पण प्रत्यक्षात उपस्थित नाहीत, अशी वास्तव परिस्थिती राज्यातील शाळांमधून दिसून येत आहे.जवळपास तीन महिन्यापासून विद्यार्थी शाळेतच नाही म्हणून ' शाळाबाह्य ' ठरतो. कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीने रोजगार व कामधंद्यासाठी हजारो कुटूंबे  स्थलांतरीत झालेली आहेत. कुटूंब स्थलांतरीत झाल्याने शाळेत जाणारी ६ ते १४ वयोगटातील मुले शाळाबाह्य होत आहेत. मुले शाळाबाह्य होवू नये,
बालकांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे यासाठी राज्यात ' एक गाव एक बालरक्षक ' ही शैक्षणिक चळवळ सुरु करण्यात आली आहे. यानुसार आता प्रत्येक गावात एक 'बालरक्षक ' शिक्षकाकडे जबाबदारी दिली जाणार आहे.

  • बालरक्षक चळवळ शालेय व्यवस्थापन समितीने बालरक्षकाची निवड करावी.
  • शाळा व ग्रामपंचायतच्या दर्शनी भागावर बालरक्षकाचे नाव लावावे.
  • पालक मेळावे, माता-पालक संघ, सहविचार सभेत शाळाबाह्य मुलांची माहिती ठेवावी लागेल. 
  • शाळाबाह्य मुलांचा दरमहा ऑनलाइन ऑफलाइन आढावा घेतला जाईल. 

तीन वर्षांपासून शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक कृती कार्यक्रम सुरु आहे. कोरोना परिस्थितीत मुले शाळाबाह्य राहू नये यासाठी  गावपातळीवर विशेष प्रयत्न केले जाणार आहे. - जगदीश कुडे , राज्य पहिले बालरक्षक 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com