
उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले असून प्रमुख प्रकल्प भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यात मंगळवारी (ता. १३) रात्री नऊ वाजल्यापासून जिल्ह्यात पाऊस सुरूच असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शेतात, घरामध्ये घुसले आहे.
जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पाचे दरवाजे उघडले जात आहेत. सीना कोळेगाव प्रकल्पाचे दरवाजे उघडले असून मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता दरवाजे उघडून पाणी सोडायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सीना नदीकाठच्या गावांना प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला आहे. याशिवाय जिल्ह्यातील तेरणा प्रकल्प पूर्णपणे भरला असून त्यातूनही मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी तेरणा नदीचे पाणी शेतातही घुसले आहे. या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान निम्न तेरणा धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे सध्या धरण ८० टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्रीपर्यंत निम्न तेरणा (माकणी) प्रकल्पातून पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदीच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आदेश
पाटबंधारे विभागाने दिले आहेत. दरम्यान मांजरा प्रकल्पही ८५ टक्केपर्यंत भरला असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. बोरी नदीवरील नळदूर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा सध्या ओसंडून वाहू लागला आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून या धबधब्यातून मोठ्या वेगाने पाणी बाहेर पडत आहे.
तीन पाझर तलाव धोकादायक
जिल्ह्यातील काळेवाडी (ता. परंडा) आणि मेडसिंगा (ता. उस्मानाबाद) येथील पाझर तलाव धोकादायक झाले आहेत. काळेवाडी येथील पाझर तलावाचा भरव खचला असल्याने सांडवा फोडण्याचे काम सुरू आहे. मात्र सांडव्याला मोठा खंदक असल्याने फोडणे कठीण जात असून त्याची दुरुस्ती सुरु केली आहे. दरम्यान पावसाचा जोर वाढत असल्याने धोका अधिकच वाढला आहे. मेडसिंगा येथील पाझर तलाव क्रमांक दोनही धोकादायक बनला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासून तेथील सांडवा फोडण्याचे काम सुरू होते. दरम्यान पाऊस सुरूच असल्याने तेथेही धोका वाढला आहे.
बार्शी -उस्मानाबाद रस्ता बंद?
नारी (ता. बार्शी) येथील पुलावर पाणी आल्याने लहान वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून बार्शी ते उस्मानाबाद वाहतूक बंद झाली आहे. याशिवाय एसटी महामंडळानेही बसफेऱ्या बंद केल्या आहेत.
बसफेऱ्या रद्द
जिल्ह्यातून अनेक ठिकाणी मोठ्या महानगरात जाण्यासाठी बससेवा सुरू झाली आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्याने प्रवाशी फिरकले नाहीत. त्यामुळे पुणे येथे जाणाऱ्या दोन फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय इतरही काही फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय उस्मानाबाद आगाराने घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
(संपादन-प्रताप अवचार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.