रेल्वेसाठी तुळजापूर तीर्थक्षेत्र अद्याप दुर्लक्षितच, आजपर्यंत अनेक आंदोलने झाली

Tuljapur Railway Issue
Tuljapur Railway Issue

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली. परंतु, याची फलश्रुती प्रत्यक्षात झाली नाही. सुरवातीला औरंगाबाद- सोलापूर त्यानंतर सोलापूर- चाळीसगाव हा रेल्वे मार्ग झाल्यास तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडले जाईल, अशा मागण्या होत्या. प्रत्यक्षात तसे काहीच घडलेले नाही. तुळजापूर तीर्थक्षेत्रावर रेल्वेबाबत सातत्याने अन्याय झालेला आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्राऐवजी लातूर- कुर्डुवाडी हा रेल्वे मार्ग झाला. तुळजापूरच्या रेल्वेमार्गासाठी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी सोलापूर लगत हा मार्ग करण्याचे निर्देशित केले होते.

तथापि हा मार्ग पुढे रेटला गेला नाही. केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी तुळजापूर- सोलापूर या रेल्वेमार्गासाठी सर्व्हेक्षणासाठी तरतूद केली. त्यानंतर मागील सहा वर्षांपासून रेल्वे मार्ग होणार अशा प्रकारच्या चर्चा होऊन सर्व्हेचे काम करण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद झाली. तथापि ही तरतूद झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाचा वाटा अर्धा राज्याने आणि अर्धा केंद्राने उचलायचा या चर्चा सुरू झाल्या आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेमार्गाने जोडण्यासंदर्भात खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनीही पाठपुरावा केला आहे.

तसेच अनेक बाबतीत खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. सुरवातीला सर्व्हेक्षणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झालेले आहे. दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्य सरकारच्या वतीने परिवहनमंत्र्यांनी विधानसभेत योग्य माहिती न दिल्याने हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचे नुकतेच घोषित केलेले आहे. वास्तविक राजकीय पक्षाकडून रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा होत असला तरीही त्याचे राजकीय भांडवल मोठ्या प्रमाणावर होत आहे.


दळणवळणाचा विचार होईना!
सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गाचा विचार करताना विदर्भातून तुळजापूर, सोलापूर मार्गे कोल्हापूर येथे जाणाऱ्या वस्तूची वाहतूक करताना इंधनाची मोठी बचत होते. तथापि सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद- नांदेडमार्गे विदर्भात रेल्वे जाऊ शकते. याचा शासन विचार करीत नसल्याचे दिसून येते. पंढरपूर, शिर्डी, शेगाव ही तीर्थक्षेत्रे रेल्वेच्या नकाशावर आहेत. मात्र, तुळजापूरचा विचार होत नाही. आठ जानेवारी २०१९ च्या रेल्वेबोर्डाच्या माहितीनुसार सोलापूर ते उस्मानाबाद ८४ किलोमीटर आणि ४४० मीटर या रेल्वे मार्गासाठी ९०४ कोटी ९२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी स्थापत्य खर्च ७२३ कोटी ९८ लाख विद्युतीकरणाचा खर्च, ८२ कोटी ९६ लाख यांत्रिकीकरणाचा खर्च, चार कोटी ४६ लाख सुरक्षेचा खर्च आहे. रेल्वे बोर्डाचे संचालक धनंजय सिंग यांनी मुंबईच्या रेल्वे व्यवस्थापनास ८ जानेवारी २०१९ रोजी लिहिलेल्या पत्रावरून खर्चाची आकडेवारी मिळालेली आहे. आर्थिक दृष्ट्या फायदेशीर प्रकल्प होण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठी पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


"रेल्वेच्या प्रश्नासाठी संघर्ष समितीचे सर्व जण यापूर्वी प्रयत्नशील होते. आजही प्रयत्नशील आहेत. अजून गरज भासल्यास आम्ही प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलला पाहिजे."
- अविनाश कोळी, अध्यक्ष, तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती, तुळजापूर

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com