जुलै-ऑगस्ट मध्ये कारखान्याशी ऊसतोडणीचा करार करून दिवाळी दसऱ्याला घराबाहेर पडलेल्या ऊसतोड कामगारांना यंदा अतिरिक्त उसाचे क्षेत्र लाभदायक ठरले.
पाचोड - जुलै-ऑगस्ट मध्ये कारखान्याशी ऊसतोडणीचा करार करून दिवाळी दसऱ्याला घराबाहेर पडलेल्या ऊसतोड कामगारांना यंदा अतिरिक्त उसाचे क्षेत्र लाभदायक ठरले. त्यांच्या दोन पैसे गाठीला शिल्लक राहण्याची चिन्हे दिसत असली तरी त्यांच्या पाल्याच्याशिक्षणाचा प्रश्र मात्र बिकटच असून लहान मुलांना त्यांचे पालक "शिकून सावरून करशील काय कष्टासाठी उभा ऱ्हाय असाच कानमंत्र देत असल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) सह चौफेर पाहावयास मिळत आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा रांजनगाव (दांडगा), थेरगाव, दाभरुळ, वडजी, देवगाव, थापटी, हर्षी, मुरमा, हिरडपूरी, रजापूर्, कोळी बोडखा आदी गावांत शेतकरी, बागायतदारांनी कारखान्यास ऊसतोडणीचा करार करून त्यांनी कारखान्याची वाट धरल्याने गावे रिकामे होऊन गावाचे गावपण हरवल्यागत झाले. कामावर जाण्याआधी ज्यांचे घरी वयोवृद्ध नाहीत, ते घरमालक कडी कोयंडा, कुलूप लावून कामावर गेले. सहा-सात महिन्यानंतर ते मोठ्या उमेदीने गावाकडे परततील.
परंतु या काळात त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊन शिक्षणाची वाताहत सुरु असल्याचे चित्र आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे सर्वत्र साखर शाळा बंद राहिल्याने त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. मात्र यंदाही सर्वत्र साखर शाळा बंद आहेत. आई वडील जेव्हा फडात गेल्यावर हातात कोयता घेत ऊसतोड करतात तेव्हा ही चिमुरडी त्यांना ''मोळ्या'' बांधण्यापासून फड़ात विस्तृत: विखुरलेले ऊस गोळा करण्यासाठी मदत करीत असल्याचे दिसून येते.
हे चित्र पाहून कामगार त्यांच्या मुलांना "शिकून सावरून करशील काय कष्टासाठी उभा ऱ्हाय बाळकडू देत असल्याचे दिसते.
परिसरातील मजूर ढोकी, नळदुर्ग, गणेशनगर, संगमनेर, रावळगाव, कोपरगाव,श्रीरामपूर, माळशिरस, प्रवरा आदी कारखान्या च्या दिशेने ऊसतोडीसाठी गेले आहेत. यंदा ते आठ महिन्याच्या अथक परिश्रमानंतर गावाकडे परततील. ती दोन पैसे गाठीला शिल्लक राहण्याची आस घेऊनच. परंतु त्याच्या पाल्याच्या शिक्षणाचे झालेले नुकसान भरून काढण्याचे शल्य त्यांच्या मनाला टोचले तरी कष्टाचे बाळकडू पाजल्याचे त्यांना समाधान मिळेल.
पोरीचे हात पिवळे करण्यासाठी मुकादमाकडुन उचल केली. यंदा उसाचं क्षेत्र ज्यादा असल्याने उचल फिटेल असे वाटते. घरी कुणी वडील मंडळी नसल्याने चिमुरडी पोरं सोबत आणलीत. आपण शिकून तरी कोणता दिवा लावला म्हणून ही पोरं लावतील. उलट आता कामे शिकून त्यांना पुढं जड जाणार नाही.
- सुखदेव राठोड