पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्हीच ठरवणार आहात ताईच्या चेहऱ्यावरचं हसू, अन् डोळ्यातलं अश्रू

Pankaja Munde
Pankaja Munde

औरंगाबादः प्रत्येक क्षण तुमच्यासाठीच खर्ची घालणार आहे, मला पद न देता दुसऱ्याला मिळालं तरी मला काहीच वाटणार नाही, कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी संघर्ष करायला शिकवलं आहे, कायम संघर्षच करत राहणार आहे. त्यामुळे पंकजा ताईंच्या चेहऱ्यावरचं हसू, अन डोळ्यातलं अश्रू हे तुम्हीच ठरवायंच आहे, ते तुमच्याच हातात आहे. कोरोना संपला की तुमच्या भेटीला येईन, आपल्याला सेवेचा यज्ञ तेवत ठेवायचा आहे यासाठी तुम्ही माझ्यासोबत आहात ना अशी भावनिक साद माजी मंत्री पंकजा मुंडे यां कार्यकर्त्यांना बुधवारी (ता.३) घातली. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

कोरोना व्हायरच्या संकटामुळे आज गोपीनाथ गडावर जाता आलं नाही याचं दुःख आहे, मात्र आज घराघरात गोपीनाथ गड आला असल्याचं सांगत आपण गडावर गेलो तर मुंडे साहेबांचे लाखो अनुयायी येतील म्हणून प्रशासनाच्या विनंतीवरुन आपण घरातच थांबणे पसंत केल्याचं त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ताईंना राजकारणात काय स्थान आहे? त्या आम्हाला भेटतील का? असे प्रश्न जनतेच्या मनात आहेत, मात्र राजकारणात स्थान आहे की नाही याचा कसलाच विचार करणार नाही. मी आजिबात निराश नाही, खचलेली नाही, खचून जाणारं माझं रक्त नाही, मात्र कोरोनामुळे गोपीनाथ गडावर आली नाही, मनावर दगड ठेऊन घरातच मुंडे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं आहे, तुम्ही सुखी रहा असं आवाहनही त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना केलं.

आजचा दिवस हा काळा दिवस नाही, त्यामुळे संघर्ष करणाऱ्यांसाठी हा संघर्ष दिन असल्याचं त्या म्हणाल्या. जन्म भाजपातच झाला आहे, त्यामुळे मी हा पक्ष जवळून पाहिला आहे. पंकजा मुंडे लोकांशी बोलत नाहीत असं कोणी कितीही म्हणाले तरी, आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकलो नाही हे खरेही आहे, पण कोरोना संपल्यानंतर मी सर्वांपर्यंत पोहोचेन असे त्या म्हणल्या.

गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पद, प्रतिष्ठा सोडून खूप काम करायचं आहे, यासाठी तुम्ही सोबत रहा असं आवाहन श्रीमती मुंडे यांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक गावात सेवेचा यज्ञ उभारणार असल्याचेही त्या म्हणाल्या. लोकशाहीत लोकं लोकनेत्याला नाकारतात, मात्र नेता लोकांना नाकारु शकत नाही, माझा परळीतून पराभव झाला मात्र माझ्या पराभवातून दुसऱ्या दिवशी बाहेर पडलेली आहे, तुम्हीही बाहेर पडा, असेही त्या म्हणाल्या.

तुम्हाला शब्द  दिलाय, तो मरेपर्यंत विसरणार नाही

सत्तेत नसतानाही सरकारला काम करण्यासाठी भाग पाडणारा विचारमंच आपल्याकडे आहे, त्यातून आपल्याला काम करायचे आहे. तुमचा माझ्या डोक्यावर हात आहे, तो हात मला तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ देणारा आहे. चार लोकं टिका करतील पण त्यामुळे खचून जायचं नाही. असं असलं तरी सगळे म्हणतात, ताई शांत का आहेत, पण शांततेच निर्णय घेता येतात, भविष्याचा वेध घेता येतो असं त्या म्हणाल्या.

आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसायचंय, यासाठी स्वाभिमानी वज्रमुठ एक ठेवा असंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडेंनी काय करावं हे केवळ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांनी ठरवावं इतर हे ठरविणारे कोण असा सवालही त्यांनी लाईव्ह माध्यमातून केला. तुमची साथ सोडून इतर काहीच मागणार नाही.हे सांगताना उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही हा शब्द दिला असून मरेपर्यंत विसरणार नाही असंही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com