पूर्ण कालावधीनंतरच काढा हळद पीक

photo
photo

हिंगोली : सध्या हळदीचे पीक वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. हळदीच्या जातीनुसार काढणीस सात ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. तो पूर्ण झाल्याशिवाय पाला कापू नये, असा सल्‍ला कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना दिला जात आहे.

जिल्‍ह्यात ३२ हजार ५३४ हेक्‍टरवर हळदीचे पीक घेण्यात आले आहे. यात हिंगोली तालुक्‍यात चार हजार ७७३ हेक्‍टर, कळमनुरी आठ हजार ४६४ हेक्‍टर, वसमत १४ हजार ९८० हेक्‍टर, औंढा नागनाथ चार हजार ९०० ; तर सेनगाव तालुक्‍यातील तीन हजार १७ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. जास्‍त पाण्याची गरज असलेल्या ऊस, केळी या पिकाच्या तुलनेत कमी पाण्यावर किफायशीर उत्‍पन्न हळद पिकांपासून मिळत असल्याने हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्‍यामुळे प्रमुख हळद उत्‍पादक जिल्हा म्‍हणून हिंगोलीची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.


आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी

काही शेतकरी जुन्याच हळदीच्या बेण्याची, तर काही शेतकरी नव्याने बेणे खरेदी करून लागवड करतात. हळदीच्या जातीमध्ये आंबे हळद, सेलम, कृष्णा या नावाचे बियाणे आहेत. बहुतांश शेतकरी सेलम जातीच्या हळदीची लागवड करतात. या हळदीच्या काढणीस आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो.हळदीच्या पिकात असलेल्या हळव्या जातींमध्ये आंबे हळद तयार होण्यास लागवडीपासून सहा ते सात महिने लागतात.

हळद काढणी अवस्थेत  काळजी घेतली पाहिजे

गरव्या असलेल्या जातीत सेलम, कृष्णा या हळदीला काढण्यास आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. सध्या हळद पीक हे वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. माळरानाच्या हलक्या जमिनीमध्ये ८० ते ९० टक्के पिकाचा कालावधी पूर्ण होते. या वेळी पाने वाळलेली असतात. मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. त्‍यामुळे हळद काढणी अवस्थेत शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

१५ ते ३० दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे

तसेच हळद काढणीस आल्यावर १५ ते ३० दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे. पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडे थोडे कमी करून नंतर पूर्णपणे बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येते. पाला वाळल्यानंतर एक इंच जमिनीच्या वर खोड ठेवून धारदार विळ्याने हळदीचा पाला कापावा, असा सल्‍ला शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे.

              पीक वाढीच्या शेवटच्या टप्प्यात

जिल्‍हात हळदीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्या हे पीक वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु, त्‍याचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पाला कापू नये, तसेच काढणीपूर्वी पंधरा दिवस अगोदर पाणी देणे बंद करून नंतरची त्‍याची काढणी करावी.
- प्रा. राजेश भालेराव, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com